सुरक्षेच्या दृष्टीने एफएसएसएआयने उचलली पाऊले
प्रतिनिधी/ बेळगाव
हॉटेल, धाबा, खानावळ किंवा बेकरी आदी ठिकाणी गॅसचा वापर सातत्याने केला जातो. त्यामुळे आगीचा भडका उडण्याची अधिक शक्यता असते. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीच खबरदारी घेतली जात नाही. त्याकरिता आता प्रत्येक हॉटेल, धाबा आणि खानावळीमध्ये अग्निशमन यंत्र ठेवणे सक्तीचे करण्यात आले आहे. याकरिता एफएसएसएआयने पाऊले उचलली आहेत.
सध्या बहुमजली इमारती आणि मॉलच्या ठिकाणी अग्निशमन यंत्राचा वापर केला जातो. मात्र हॉटेल, खानावळ, धाबा, बेकरी अशा आगीचा आणि गॅसचा वापर केला जाणाऱ्या ठिकाणी अग्निशमन यंत्राचा वापर केला जात नाही. बहुतांशवेळा अशा ठिकाणी आगीचा भडका उडाल्याच्या घटना घडल्याचे निदर्शनास आले आहे. तेथील सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीच उपाययोजना राबविण्यात आली नाही. त्यामुळे शासनाने विशेष खबरदारी घेतली आहे. हॉटेल तसेच खाद्यपदार्थ बनविण्याच्या ठिकाणी अग्निशमन यंत्र बसविण्याची सक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. बेकरी, धाबा, रेस्टॉरंट, हॉटेल, खानावळी आदी ठिकाणी नागरिकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे नागरिकांना धोका आहे. नागरिकांच्या आणि व्यवस्थापन मंडळाच्या सुरक्षेसाठी अग्निशमन यंत्र ठेवणे सक्तीचे केले आहे. खाद्यपदार्थ बनविण्याच्या ठिकाणी तसेच गॅसचा वापर किंवा आगीचा वापर करण्यात येणाऱ्या प्रत्येक ठिकाणी अग्निशमन यंत्र ठेवण्याची सूचना केली जात आहे. याकरिता एफएसएसएआयच्या माध्यमातून अंमलबजावणी करण्यात येत आहे. बेळगाव परिसरातील हॉटेल, धाबा, रेस्टॉरंट, बेकरी आणि खानावळींना एफएसएसआयएच्यावतीने नोटीस बजावण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. सदर मोहिमेंतर्गत तपासणी केली जात आहे. अग्निशमन यंत्र नसल्यास चार हजार रुपये भरून घेऊन यंत्र देण्यात येत आहे. शासनाच्या सूचनेनुसार यापुढे हॉटेल, धाबा, रेस्टॉरंट, बेकरी आणि खानावळीमध्ये अग्निशमन यंत्र ठेवणे बंधनकारक राहणार आहे.