सुमारे दोन लाखांचे नुकसान : सुदैवाने जीवित हानी टळली
प्रतिनिधी /वाळपई
चोर्ला घाट परिसरामध्ये एका ट्रकच्या मागील आठ चाकांच्या टायर्सना आग लागल्यामुळे मोठय़ा प्रमाणात नुकसानी झाली. सुदैवाने जीवित हानी टळली. अग्निशामक दलाच्या जवानाने ताबडतोब घटनास्थळी धाव घेऊन टायरला लागलेली आग विझवून पुढील नुकसान टाळले. अन्यथा ट्रकाचे प्रचंड प्रमाण नुकसान झाले असते. या घटनेत सुमारे दोन लाखांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.
बेळगाव भागातून चोर्ला मार्गे गोव्यात येणारा ट्रक अंजुणे धरणाच्या नजीक पोचला असता ट्रकाच्या मागील चाकांच्या टायरना आग लागल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी सतर्क होऊन आग पाण्याचा फवारा मारून विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला यश आले नाही. त्यानंतर वाळपई अग्निशामक दलाला याबाबत कळविल्यानंतर जवानांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेऊन ट्रकच्या चाकांना लागलेली आग वझविली. मात्र एक टायर वगळता इतर सर्व टायर्सना आग लागून जळून खाक झाले. त्याचप्रमाणे ट्रकाच्या इतर भागांनाही झळ पोचून आगीमुळे नुकसान झाले. यामध्ये सुमारे दोन लाखांचे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.