बाणसाय – कुडचडे येथे अज्ञाताकडून प्रकार, एक कामगार ठार, दुसरा गंभीर जखमी, परिसरात खळबळ, गुन्हय़ात गुंतलेल्यांना तत्काळ गजाआड करण्याची मागणी
प्रतिनिधी / कुडचडे
राज्यात रेती उपशावर बंदी असली, तरी गेल्या कित्येक महिन्यांपासून बेकायदेशीररीत्या रेती उपसा चालूच असून बाणसाय, कुडचडे येथे अशाच प्रकारे बुधवारी रात्री उशिरा रेती उपसा करणाऱया दोन कामगारांवर अज्ञात व्यक्तीने गोळी झाडल्यामुळे झारखंड येथील कामगार युसूफ आलम (वय 23) याचा मृत्यू झाला, तर दुसरा कामगार मोहम्मद सावी (वय 33) हा गंभीर जखमी झाला आहे. सावी याला उपचारासाठी बांबोळीतील गोमेकॉ येथे दाखल करण्यात आल्याची माहिती कुडचडे पोलीस स्थानकातून प्राप्त झाली. सदर घटनेमुळे गणेश चतुर्थीच्या दुसऱया दिवशी संपूर्ण कुडचडे मतदारसंघात खळबळ उडाली.
अधिक माहितीनुसार, सदर घटनेची माहिती कुडचडे-काकोडा प्राथमिक केंद्रातून पहाटे 3.10 च्या सुमारास मिळाली. या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम 302, 307 खाली गुन्हा नोंद करण्यात आला असून घटनेचा तपास कुडचडेचे निरीक्षक वैभव नाईक हे करत असल्याची माहिती उपअधीक्षक नीलेश राणे यांनी या प्रतिनिधीला दिली. या प्रकरणी पोलीस अधीक्षक सॅमी तावारीस यांनीही लक्ष घातले आहे.
कोणाच्या आशीर्वादाने रेती उपसा ?
राज्यात रेती उपसा करण्यावर बंदी असूनसुद्धा कुडचडे परिसरात बेकायदेशीररीत्या रेती उपसा कसा सुरू आहे ते या घटनेमुळे उघडकीस आले आहे. न्यायालयाने बंदीच्या कडक अंलबजावणीचा आदेश दिलेला असूनसुद्धा सदर प्रकार कुडचडे परिसरात कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे याविषयी चर्चेला कुडचडेत जोर आला आहे. न्यायालयाचा आदेश असतानादेखील यासंदर्भात उपजिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस खात्याकडून सक्त कारवाई का करण्यात येत नाही हा गंभीर विषय असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त करण्यात येत आहे. कुडचडेचे आमदार हे पर्यावरण व कायदामंत्री असूनसुद्धा अशा बेकायदेशीर व्यवसायांना मोकळीक कशी काय मिळत आहे, असा प्रश्न लोकांकडून उपस्थित केला जात आहे.
जानेवारीतही रंगली होती गोळीबाराची चर्चा
कुडचडेत असे प्रकार घडू लागल्याने येथील लोकांकडून बरीच नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. कारण जानेवारीत याच ठिकाणी अशाच प्रकारे एका रेती उपशात गुंतलेल्या कामगारावर गोळी झाडण्यात आल्याची चर्चा परिसरात रंगली होती. पण त्याविषयीचे गूढ अजूनही उलगडलेले नाही. अशा परिस्थितीत त्याच ठिकाणी पुन्हा गोळीबार होऊन एकाचा मृत्यू होणे ही स्थानिक पोलिसांसाठी लज्जास्पद बाब असल्याच्या प्रतिक्रिया लोकांमधून व्यक्त होत आहेत. आता तरी या घटनेत गुंतलेल्या आरोपींना ताबडतोब गजाआड करण्यात यश येणार की, आरोपी मोकळे फिरत राहणार असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे.
रेती उपशातून प्रकरण घडल्याचा संशय
मयत व्यक्तीचे स्थानिक पातळीवर कुणाशी शत्रूत्व होते असे वरकरणी तरी दिसत नाही. हा प्रकार खासगी दुश्मनीतून घडला आहे की, अन्य कारणामुळे याचा छडा लागण्याची गरज असून पोलिसांनी या प्रकरणात गुंतलेल्यांची कोणत्याच प्रकारे गय करू नये व ताबडतोब त्यांना अटक होईल याची दक्षता घ्यावी, अशी मागणी होत आहे. सदर घटना बेकायदेशीर रेती उपशाच्या प्रकारातून घडलेली असावी असा संशय करण्यात येत आहे. कारण सदर घटना रेतीचा साठा असलेल्या ठिकाणाहून अंदाजे 500 मीटरवर झालेली आहे. ही घटना अन्य कारणास्तव घडली असती, तर रात्री उशिरा सदर कामगार होडीत असताना व नदीच्या काठापासून 500 मीटर अंतरावर असताना घडली असती का, असा प्रश्न सध्या चर्चेत आला असून या प्रकरणाच्या तपासकामाकडे कुडचडे मतदारसंघाबरोबर संपूर्ण राज्याचे लक्ष आता लागून राहिले आहे.
मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावे : पाटकर
कुडचडेत बेकायदेशीर रेती उपसाप्रकरणातील कामगाराचा खून होण्याच्या प्रकारावर प्रदेश काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी खेद व्यक्त करताना गोव्यात सध्या कायद्याची पायमल्ली करण्याच्या प्रकारांना सीमाच राहिलेली नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अशा प्रकारे कायद्याचे उल्लंघन करण्याचे प्रकार वजनदार व्यक्तीचा आशीर्वाद असल्याशिवाय होऊच शकत नाहीत. त्यात कुडचडेचे आमदार हे राज्याचे पर्यावरणमंत्री व कायदामंत्री असूनसुद्धा बंदी घालण्यात आलेले व्यवसाय कुडचडे मतदारसंघात कसे चालतात त्याचे उत्तर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी द्यावे, असे पाटकर यांनी म्हटले आहे. या गुन्हय़ात गुंतलेल्यांना ताबडतोब अटक करण्यावर भर द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.