भाजप-रालोआ उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचा प्रचंड मताधिक्क्याने विजय
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
मुर्मू यांचा शपथविधी 25 जुलैला होणार आहे. त्यांना भारताचे सरन्यायाधीश एन. व्ही. रामण्णा हे पद आणि गोपनियतेची शपथ देतील. मुर्मू यांच्या रुपाने भारताचे सर्वोच्च घटनात्मक पद प्रथमच एका आदिवासी महिलेला भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात मिळाले आहे. या विजयानंतर त्यांच्यावर भारतासह जगभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
18 जुलैला निवडणूक
राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मतदान 18 जुलैला पार पडले होते. लोकसभा आणि राज्यसभेचे सर्व सदस्य, तसेच सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभांचे सदस्य या निवडणुकीत मतदार असतात. ही निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने घेतली जाते आणि राजकीय पक्षांना आपल्या खासदार किंवा आमदारांवर पक्षादेश लागू करता येत नाही. या निवडणुकीचा निर्णय मतमूल्यांकन पद्धतीने होतो. प्रत्येक संसद सदस्याच्या मतांचे मूल्य 708 इतके असते तर राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभांच्या सदस्यांचे मूल्य त्या-त्या राज्यातील लोकसंख्येच्या प्रमाणानुसार निर्धारित केले जाते.
उमेदवारी अनपेक्षित
द्रौपदी मुर्मू यांना सत्ताधारी भाजप-रालोआची उमेदवारी काहीशी अनपेक्षितरित्याच मिळाली होती. त्यांच्यासह किमान सहा ते सात नावे चर्चेत होती. तथापि, त्यांना उमेदवारी मिळाल्यानंतर अनेक पक्षांनी त्यांना पाठिंबा घोषित केला होता. या पक्षांमध्ये रालोआबाहेरच्या आणि केंद्र सरकारला विरोध करणाऱया पक्षांचाही समावेश होता. विरोधी पक्षांनी एकत्र येण्याचा प्रयत्न करत माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांना उमेदवारी दिली. मात्र, प्रत्यक्षात त्यांना सर्व विरोधी पक्षांचे समर्थन मिळू शकले नाही. शिवसेना, झारखंड मुक्ती मोर्चा, वायएसआर काँगेस, अकाली दल, बिजू जनता दल, तसेच काही छोटय़ा विरोधी पक्षांनीही पाठिंबा दिल्याने मुर्मू यांची बाजू मतदानापूर्वीच भक्कम झाली होती. त्यांचा विजय निश्चित मानला जात होता. अखेर त्याप्रमाणेच घडले आहे.
ऐक्याचे प्रयत्न फसले
राष्ट्रपतिपद निवडणुकीच्या निमित्ताने आपल्या एकजुटीचे प्रदर्शन करण्याचा विरोधी पक्षांचा प्रयत्न होता. लोकसभा, राज्यसभा आणि सर्व विधानसभा यांच्यातील संख्याबळाचा विचार करता प्रारंभी भाजप-रालोआला बहुमतासाठी 1.5 टक्के मते कमी पडत होती. त्यामुळे सर्व विरोधी पक्ष एकत्र आल्यास चमत्कार घडू शकतो आणि भाजप-रालोआला धक्का बसू शकतो अशी विरोधकांची अटकळ होती.
त्यामुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विरोधी ऐक्य घडविण्यात पुढाकार घेतला होता. प्रारंभी त्यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना गळ घालण्याचा प्रयत्न केला. नंतर गोपाळकृष्ण गांधी यांनाही विचारणा झाली होती. तथापि, त्यांनी नकार दिल्याने अखेर यशवंत सिन्हा यांची विरोधी पक्षांचे संयुक्त उमेदवार म्हणून निवड करण्यात आली होती. तथापि, त्यांना सर्व विरोधी पक्षांचे समर्थन मिळविण्यात अपयश आल्याने ही निवडणूक चुरशीची न होता एकतर्फी झाली आहे. मुर्मू यांनी उमेदवारी मिळाल्यानंतर जवळपास सर्व राज्यांमध्ये दौरा करुन आपल्यासाठी सर्व पक्षांचा पाठिंबा मागितला होता.
अखेर शिवसेनेचाही पाठिंबा
2019 मध्ये महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीनंतर विजयी भाजप-सेना युती तुटली आणि शिवसेनेने काँगेस आणि राष्ट्रवादी काँगेसशी घरोबा करत मुख्यमंत्रीपद मिळवून सरकार स्थापन केले. त्यामुळे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेना रालोआच्या उमेदवाराला मतदान करणार नाही, हे निश्चित होते. मात्र गेल्या महिनाभरात महाराष्ट्रात घडलेल्या राजकीय भूकंपामुळे अखेर शिवसेनेनेही मुर्भू यांनाच पाठिंबा घोषित केला होता. त्यामुळे त्यांच्या मतांमध्ये वाढ झाली.
दोन्ही नेते स्वातंत्र्यानंतर जन्मलेले…
द्रौपती मुर्मू यांच्या विजयानंतर एक अनोखा योग जुळून आला आहे. राष्ट्रपती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताचे दोन्ही सर्वोच्च नेते स्वातंत्र्यप्राप्तीनंतर जन्माला आलेले आहेत. असा योग भारताच्या इतिहासात प्रथमच आलेला आहे. पंतप्रधान मोदींचा जन्म 1950 मधील, तर 1958 मधील आहे. मुर्मू यांचा नावे राज्यपालपदी सर्वाधिक काळ राहण्याचाही विक्रम नोंद आहे.
पंतप्रधान मोदी भेटीला…
द्रौपदी मुर्मू यांचा विजय निश्चित झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः मुर्मू यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे अभिनंदन केले. यावेळी त्यांच्यासह भाजपचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते. तसेच मुर्मू यांचे काही कुटुंबियही उपस्थित होते. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंग, माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि इतर अनेक नेत्यांनी मुर्मू यांचे विजयासाठी अभिनंदन केले.
कष्टाळू नेत्याचा विजय
द्रौपदी मुर्मू यांच्या विजयामुळे एक कष्टाळू नेता देशाच्या सर्वोच्चपदी पोहचला आहे. त्यांनी त्यांच्या जीवनात मोठा संघर्ष केला आहे. तसेच अतीव दुःखाचे प्रसंग सोसले आहेत. या विजयासाठी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
नरेंद्र मोदी, पंतप्रधान
भारताच्या 15 व्या राष्ट्रपती
द्रौपदी मुर्मू या भारताच्या 15 व्या राष्ट्रपती होत आहेत. 25 जुलैला त्यांचा अधिकृतरित्या शपथविधी झाल्यानंतर त्या हा पदभार स्वीकारणार आहेत. आतापर्यंत 1950 पासून राष्ट्रपतिपदासाठी 14 वेळा निवडणूक झाली आहे. 2 वेळा कार्यकारी राष्ट्रपती झाले आहेत.
आतापर्यंतचे राष्ट्रपती आणि कालावधी
क्रमांक नाव कालावधी वर्षे
- 1. डॉ. राजेंद्र प्रसाद . 1950 ते 1962. 12
- 2. डॉ. राधाकृष्णन .. 1962 ते 1967. 05
- 3. डॉ. झाकीर हुसेन. 1967 ते 1969. 02
- 4. वराह व्यंकट गिरी ………………… 1969 ते 1969 कार्यकारी
- 5. वराह व्यंकट गिरी 1969 ते 1974. 05
- 6. फप्रुद्दिन अली अहमद……………… 1974 ते 1977 03
- 7. बसाप्पा दानप्पा जत्ती……………. 1977 ते 1977 कार्यकारी
- 8. नीलम संजीव रेड्डी ……………….. 1977 ते 1982 5 वर्षे
- 9. ग्यानी झैलसिंग .. 1982 ते 1987. 05
- 10. आर. व्यंकटरामन ………………… 1987 ते 1992 05
- 11. शंकरदयाळ शर्मा 1992 ते 1997 05
- 12. के. आर. नारायणन ………………. 1997 ते 2002 05
- 13. डॉ. एपीजे कलाम………………… 2002 ते 2007 05
- 14. प्रतिभा पाटील .. 2007 ते 2012. 05
- 15. प्रणब मुखर्जी ….. 2012 ते 2017. 05
- 16. रामनाथ कोविंद 2017 ते 2022 05