मत्स्यखात्यातर्फे विशेष योजना : ग्रामपंचायतींचे वाढणार उत्पन्न : प्रत्येक तलावाला 4 हजार मत्स्यबिजे मोफत पुरविणार
प्रतिनिधी /बेळगाव
जिल्हय़ातील 485 ग्रामपंचायत अखत्यारीतील 194 तलावांमध्ये मत्स्यपालन केले जाणार आहे. यासाठी प्रत्येक तलावाला 4 हजार मत्स्यबिजे मोफत पुरविली जाणार आहेत. यामुळे संबंधित ग्रामपंचायतींचे उत्पन्न वाढणार आहे. शिवाय तलावातील मत्स्यपालनाची आणि विक्रीची संपूर्ण जबाबदारी ग्रामपंचायतींवर राहणार आहे.
जिल्हय़ात मत्स्यशेती करणाऱया शेतकऱयांची संख्या वाढत आहे. एकूण 485 ग्राम पंचायतींमध्ये 600 तलाव आहेत. यातील बहुतांशी तलाव वापराविना पडून आहेत. अशा तलावांमध्ये मत्स्यपालनाला प्रोत्साहन दिले जाणार आहे. त्यामुळे तलावांचे संरक्षण होऊन उत्पन्न वाढीमुळे ग्रामीण भागाच्या विकासात भर पडणार आहे. खात्याने निवडलेल्या 194 तलावांमध्ये मोफत मत्स्यबीज सोडले जाणार आहे. याची संपूर्ण जबाबदारी संबंधित ग्राम पंचायतींवर राहणार आहे.
ग्रामीण भागातील तलावांमध्ये प्रथमच मत्स्यपालन
मत्स्य खात्यामार्फत विविध जलाशये, नदी आणि तलावांतून मत्स्यपालन केले जाते. खात्याच्या अखत्यारीतील 221 तलावांपैकी 110 तलाव हिडकल जलाशय, घटप्रभा, मलप्रभा, कृष्णा, मार्कंडेय नद्यांमध्ये मत्स्यपालन केले जाते. त्यामुळे अलीकडे जिल्हय़ातील मत्स्य उत्पादनात वाढ झाली आहे. शिवाय जिल्हय़ातील 40 हून अधिक कृषी तलावांमध्ये मत्स्यपालन होणार आहे. ग्रामीण भागातील तलावांमध्ये प्रथमच मत्स्यपालनाला प्रोत्साहन मिळत असल्याने ग्राम पंचायतींचे वार्षिक उत्पन्नही वाढणार आहे.
मत्स्यपालनासाठी पडिक जमीन उपयोगात आणणार
याचबरोबर जिल्हय़ातील 1.50 लाख हेक्टर नापीक जमिनीतही मत्स्यखात्यातर्फे विशेष योजना राबवून मत्स्यपालनाला चालना दिली जाणार आहे. जिल्हय़ातील कृष्णा, घटप्रभा, मलप्रभा नदीकाठांवरील 64 हजार हेक्टर क्षेत्र नापीक बनले आहे. अशा पडिक क्षेत्रामध्ये रोजगार हमी योजनेतून खोदाई करून तलाव निर्मिती करून मत्स्यपालन केले जाणार आहे. त्यामुळे पडिक जमीन उपयोगात येणार आहे.
अतिवृष्टी, पाणी साचणे, रासायनिक खतांचा वाढता वापर यासह इतर कारणांनी पडिक जमिनीचे क्षेत्र वाढले आहे. अशा शेतीमध्ये मत्स्यशेती सुरू करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे. त्यामुळे लवकरच नापीक जमिनीतही मत्स्यपालन होणार आहे.
विशेषतः ग्रामीण भागातील निवड झालेल्या तलावांमध्ये राहू, गिरमल, मृगल आणि कटला जातींच्या माशांची पिल्ले सोडली जाणार आहेत. त्यानंतर संपूर्ण देखभाल आणि विक्रीची जबाबदारी ग्राम पंचायतींवर असणार आहे. त्यामुळे संबंधित ग्राम पंचायतींची जबाबदारी वाढणार आहे.
मत्स्य पालनातून ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात वाढ
जिल्हय़ातील 485 ग्रामपंचायतींमध्ये 194 तलावांची निवड करण्यात आली आहे. या तलावांमध्ये मोफत मत्स्यबीज सोडले जाणार आहे. त्यानंतर देखभाल आणि इतर जबाबदारी संबंधित ग्राम पंचायतींवर असणार आहे. शिवाय मत्स्य पालनातून ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढणार आहे. त्यामुळे मत्स्यपालन ग्रामपंचायतींना आर्थिक उत्पन्न मिळवून देणारे ठरणार आहे.
सुधाकर पी. (सहसंचालक, मत्स्य खाते)