समुद्रात गेलेल्या अनेक मासेमारी नौका पुन्हा किनाऱ्याकडे परतल्या
हंगामाच्या प्रारंभापासून उभे ठाकले विघ्न
रत्नागिरी प्रतिनिधी
दोन महिन्यांच्या बंदी कालावधीनंतर रत्नागिरीतील मच्छीमार नौका वातावरणाचा अंदाज घेत समुद्रावर सोमवारी स्वार झाल्या होत्या. पण आतापुन्हा सकिय झालेल्या पावसाचा फटका मच्छीमारीला बसला आहे. वेगवान वाऱ्यामुळे समुद्र खवळल्याने अनेक मच्छीमारांनी सुरक्षेसाठी जवळच्याबंदरात आसरा घेतला आहे. पावसाळा सुरू होताच 1 जूनपासून मासेमारी नौकांना समुद्रात बंदी घालण्यात आली होती. ही बंदी उठताच 1 ऑगस्टपासून पुन्हा मासेमारी हंगामाला प्रारंभ झाला आहे. बंदी कालावधी संपुष्टात आल्यानंतर ट्रॉलर,गिलनेटसह फिशिंगच्या नौका मासेमारीसाठी समुद्रावर स्वार झाल्या होत्या.
सुरुवातीला गिलनेटला बांगडा, ट्रॉलिंगला चिंगळं आणि म्हाकुळ मासा मिळत होता. श्रावण महिना सुरू झाल्याने अनेकांचे उपवास सुरू असल्याने मासळीचे दरही स्वस्त झाले होते. मात्र मासेमारी हंगाम सुरूवात झालेली असली तरी पावसामुळे खोल समुद्रात वातावरण बिघडले आहे. त्यामुळे बहुसंख्यनौका बंदरातच उभ्या आहेत.आता तर पुन्हा पावसाच्या वातावरणामुळे सुरू झालेल्या मासेमारीला ब्रेक मिळाला आहे. वेगवान वाऱ्यांमुळे समुद्र खवळलेला आहे. त्यामुळे मासेमारीसाठी बाहेर पडलेल्या अनेक मच्छीमारांनी सुरक्षेसाठी जवळच्या बंदरात आसरा घेतला आहे. हंगामाच्या सुरवातीलाच अडथळा निर्माण झाला आहे.पण नारळी पौर्णिमेनंतरच नियमित मासेमारीला सुरवात करणे योग्य ठरणारअसल्याचे रत्नागिरीतील मच्छीमार देवदत्त भुते यांनी सांगितले.