प्रतिनिधी /पणजी
गोवा राज्यातील समुद्रात आज बुधवार दि. 1 जूनपासून 31 दिवसांची मासेमारी बंदी सुरु होणार असून ती 31 जुलै पर्यंत म्हणजे 2 महिने चालणार आहे. अशी माहिती मच्छिमार मंत्री निळकंठ हळर्णकर यांनी दिली. त्या कालावधीत बंदी कडक नियंत्रणात अंमलात आणणार असल्याचे ते म्हणाले. इतर राज्यातील ट्रॉलर्स – बोटीनीं गोव्यात येवून मासेमारी करु नये याकरीता खात्यातर्फे पाळत ठेवणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
जून – जुलै हे दोन पावसाचे महिने मासळीसाठी प्रजननाचा कालावधी असल्याने सदर बंदी घालण्यात येत असून मासळीची मोठय़ा प्रमाणात पैदास व्हावी आणि ती सर्वांना मिळावी हा त्यामागील हेतू असल्याचे हळर्णकर म्हणाले. या बंदीमुळे गोव्यात मासळीची टंचाई कमतरता भासणार असून ती भरुन काढण्यासाठी कर्नाटक महाराष्ट्र केरळ – तामिळनाडू व इतर राज्यातून तीची आवक होणार आहे. त्यामुळे मासळीच्या किमंती आणखी वाढणार असल्याचे दिसून येते.
स्थानिक लोक नदी नाले व इतर ठिकाणी मासळीच्या शोधासाठी फिरणार असून काहीजण सुक्या मासळीवर ताव मारुन तिची उणीव भरुन काढणार आहेत. या बंदीमुळे लोकांना ताजी मासळी मिळणे अवघड होणार असून इतर राज्यातून येणारी मासळी बर्फातील शीतग्रहातील असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
या बंदीची अधिसूचना खात्याने जारी केली असून त्याची कडक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. 1 जून व 31 जुलै असे दोन्ही दिवस धरुन बंदी आहे. यांत्रिक बोटींनी मासेमारी करण्यास वरील काळात बंदी घालण्यात आली असून मरीन फिशिंग रेग्युलेशन कायदा 1980 प्रमाणे सदर अधिसूचना काढण्यात आल्याचे त्यात म्हटले आहे.