कोल्हापूर; कोरोनाचा प्रादूर्भाव कमी झाल्याने यंदाच्या शिवराज्याभिषेक सोहळय़ासाठी किल्ले रायगडावर मोठय़ाप्रमाणात शिवभक्त येणार आहेत. सुमारे पाच लाख शिवभक्त रायगडावर येण्याची शक्यता आहेत. त्यामुळे सर्वांनी शिवराज्याभिषेक सोहळय़ात स्वयंस्फूर्तीने सहभागी होत, शिस्तीने हा सोहळा अमाप उत्साहात साजरा करावा, असे आवाहन युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांनी केले.
शिवराज्याभिषेक सोहळय़ानिमित्त भवानी मंडप येथे अखिल भारतीय शिवराज्याभिषेक समितीची शुक्रवारी बैठक झाली. या बैठकीमध्ये मार्गदर्शन करताना युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती बोलत होत्या. यावेळी शहाजीराजे छत्रपती प्रमुख उपस्थित होते. युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती म्हणाल्या, छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक सोहळा प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही ६ जून रोजी किल्ले रायगडावर मोठय़ा उत्साहात साजरा करायचा आहे. गेली दोन कोरोना संसर्गामुळे हा सोहळा शासनाच्या निर्बंधांचे पालन करत मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थित झाला. मात्र आता कोरोनाचा संसर्ग कमी झाला आहे. शासकीय निर्बंधही शिथिल झाले आहेत. त्यामुळे यंदाच्या शिवराज्याभिषेक सोहळय़ाला मोठय़ासंख्येने तरुण उपस्थित राहणार आहेत. नेहमीप्रमाणे शिस्तीने आणि उत्साहात हा सोहळा होण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे, असे आवाहन युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांनी केले.
अखिल भारतीय शिवराज्याभिषेक समितीचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत म्हणाले, गडकोटांच्या संवर्धनासाठी संभाजीराजे छत्रपती यांचा सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली किल्ले रायगड येथे होणाऱया शिवराज्याभिषेक सोहळय़ाला लोकोत्सवाचे स्वरुप आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे विचार पुढे नेण्याचे काम संभाजीराजे करत आहेत. त्यामुळे शिवराज्याभिषेक सोहळय़ामध्ये सहभागी होणारे सर्व मावळे शिस्तीचे पालन नक्कीच करतील. नेहमीप्रमाणे यंदाही या सोहळा भव्यदिव्य स्वरुपात होईल असे सावंत यांनी सांगितले.
बैठकीला लाला गायकवाड, बाबा महाडिक, संदिप पाटील, शाहिर दिलीप सांवत, प्रसन्न मोहिते, उदय घोरपडे, किशोर घोरपडे, अनिल घाटगे, गणी आजरेकर, चंद्रकांत पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.