गोवा प्रभारी सी. टी. रवी यांचा दावा
प्रतिनिधी/ पणजी
विद्यमान विरोधी पक्षांमधील किमान पाच आमदार भाजपच्या संपर्कात असून पक्षप्रवेश करण्यास उत्सुक आहेत, असा दावा भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा गोवा प्रभारी सी. टी. रवी यांनी केला आहे. त्यांच्या प्रवेशास होकार दर्शविल्यास पक्षाची ताकद वाढू शकते, असे निवेदन त्यांनी केले आहे. मात्र, हे आमदार काँग्रेसचे की अन्य पक्षांचे त्याबद्दल मात्र रवी यांनी स्पष्ट काही सांगितले नाही.
शनिवारी पणजीत आयोजित भाजपच्या राज्य कार्यकारिणी बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, संघटनमंत्री सतीश धोंड यांच्यासह अन्य मंत्री, आमदार आणि पक्षाचे पदाधिकारी, राज्यभरातील मंडळाचे अध्यक्ष आदींची उपस्थिती होती. नीलेश काब्राल, गोविंद गावडे, बाबूश मोन्सेरात तसेच रमेश तवडकर, ज्योशुआ डिसोझा, जेनिफर मोन्सेरात हे मंत्री, आमदार विविध वैयक्तिक कारणांमुळे या बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत.
पुढे बोलताना रवी यांनी, आमच्याकडे 20 आमदार होते. त्यात आणखी पाच जणांचा पाठिंबा मिळाला. त्यामुळे काळजी करू नका, एकदा पक्षाने परवानगी दिली की आम्ही नक्की 30 चा आकाडा पार करू, असा विश्वास व्यक्त केला.
2017 ते 2022 दरम्यान काँग्रेसचे डझनभर आमदार सत्ताधरी पक्षात सामील झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यापेक्षा अधिक लोकप्रिय असल्याचा दावाही रवी यांनी केला.
गत फेब्रुवारी महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 20 जागा मिळविल्या. त्यानंतर 3 अपक्ष आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या दोन आमदारांच्या पाठिंब्याने सरकार स्थापन केले.
‘त्यां’ आमदारांबद्दल अनभिज्ञ ः तानावडे
दरम्यान, कार्यकारिणी बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी संबंधित प्रश्नावर बोलताना, पक्षात प्रवेश करण्यास कोण इच्छुक आहेत त्याबद्दल आपणास कोणतीच माहिती नाही, असे सांगितले. पत्रकार परिषदेस सिद्धार्थ कुंकळकर, प्रेमानंद म्हांबरे, गिरीराज वेर्णेकर, ऍड. यतीश नाईक, सावियो रॉड्रिगीश आणि उर्फान मुल्ला यांची उपस्थिती होती.
राज्य विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच आयोजित ही राज्य कार्यकारिणी बैठक होती. प्रारंभी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जयंतीनिमित्त आदरांजली वाहण्यात आली. उद्घाटन सोहळ्यानंतर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच अन्य विषयांसह भविष्यातील कार्यक्रमांवर चर्चा करण्यात आली.
भाजप सदोदित एका निवडणुकीनंतर दुसऱया निवडणुकीच्या तयारीस लागतो. यापूर्वी 6 ते 20 एप्रिल या कालावधीत राज्यभरात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले होते. त्याद्वारे केंद्र सरकारच्या विविध योजना लोकांपर्यंत पोहोचविण्याच्यादृष्टीने जागृती करण्यात आली होती. आता 25 मे ते 31 जुलै दरम्यान बूथ सशक्तीकरण अभियान राबविण्यात येणार आहे. 25 रोजी राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी व्हर्च्युअल माध्यमातून अभियानाचे उद्घाटन केल्यानंतर देशभरातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. अशाच प्रकारे समारोपास पंतप्रधान नरेंद्र मोदी हिमाचल प्रदेशमधून व्हर्च्युअल माध्यमाद्वारे कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत, असे तानावडे यांनी सांगितले.
गोव्यात नुकत्याच झालेल्या निवडणूक काळात सर्व प्रकारे पाठबळ तसेच पक्षास तिसऱयांदा सत्तास्थानी आणण्यात बहुमूल्य मार्गदर्शन केल्याबद्दल या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, प्रभारी श्री. रवी, निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस, सहप्रभारी जी. किशन रेड्डी, आणि श्रीमती दर्शना जर्दोश यांचे आभार व्यक्त करण्यात आले.
भाजपला मिळालेल्या या अभूतपूर्व यशातून गोव्यात लोकांच्या तनामनात भाजप रुजला असल्याचे स्पष्ट झाले आहे. म्हणूनच विरोधी काँग्रेस, आप आणि तृणमूल आदी पक्षांनी केलेल्या अपप्रचाराचा कोणताही परिणाम मतदारांवर न होता त्यांनी भाजपला पाठिंबा दिला, असे तानावडे म्हणाले.
पंतप्रधान मोदी यांचे अभिनंदन
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे खंबीर नेतृत्व, दूरदृष्टी आणि सर्वांना सोबत घेऊन जाण्याची कार्यशैली यामुळे राज्यात सध्या स्थिर सरकार आहे. त्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करण्यात आले. त्याचबरोबर पंतप्रधानपदी 8 वर्षांचा सेवाकाळ पूर्ण केल्याबद्दल श्री. मोदी यांचेही अभिनंदन करण्यात आले.
भाजपने निवडणूक काळात लोकांना दिलेले प्रत्येक आश्वासन पूर्ण करण्याचे प्रयत्न करण्यात येणार असून खास करून वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत देणे तसेच पंचायतींना मनोहर पर्रीकर निधी सुपूर्द करण्याकडे कटाक्ष असेल. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी 2022-23 च्या अर्थसंकल्पात आर्थिक तरतुदही केली आहे, असे तानावडे म्हणाले.
पंचायत निवडणुकीचा मार्ग मोकळा करावा
दरम्यान, राज्यात होऊ घातलेली पंचायत निवडणूक तिच्या नियोजित वेळेतच व्हावी यासाठी प्रयत्न व्हावे, अशी मागणी कार्यकारिणीने केली. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी राखीवतेसंबंधी घातलेल्या अटींची लवकरात लवकर पूर्तता करून निवडणुकीचा मार्ग मोकळा करावा, असेही यावेळी सूचविण्यात आले.