अभंग, भजने आणि भक्तीगीतांनी दुमदुमला मार्ग, 25 ते 30 हजार जणांचा सहभाग, खंडोबा तालीमजवळ उभे तर पुईखडीवर गोल रिंगण सोहळा
कोल्हापूर प्रतिनिधी
जाता पंढरीसी सुख वाटे जीवा…
आनंदे केशवा भेटतांची…
या सुखा उपमा नाही त्रीभुवनी…
पहिली शोधोनी अवघी तीर्थे…यासह अनेक अभंगांची बरसात करत आणि गेली दोन वर्षे अंतरलेल्या विठ्ठल-रुक्मिणीच्या भेटीची आस घेऊन रविवारी सकाळी कोल्हापूर ते प्रतिपंढरपूर नंदवाळ या पायी दिंडीचे श्री ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा भक्त मंडळाचे आयोजन केले. दिंडीत फुलांनी सजवलेल्या रथामध्ये विराजमान चांदीच्या पालखीत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांची मूर्ती व पादुका अग्रभागी होत्या. या पादुकांच्या मागे व पुढे कोल्हापूरसह शंभरहून अधिक गावांमधील विणेकरी, भजनी मंडळे, तुळशी वृंदावन डोक्यावर घेतलेल्या महिला, टाळकरी व मृदुंगधारकांसह 25 ते 30 हजार विठ्ठल भक्तांचा दिंडीत जणू महापूरच उसळला होता. या महापुरात टाळमृदुंगाच्या तालावर हातातील दिंडय़ा पताका लहरताना होय होय वारकरी…पाहे पाहे पंढरी असा गजर करुन दिंडीमार्ग दुमदुमून सोडला. अशा वातावरणातच अभंग, भजनांसह वरुणराजाच्या साक्षीने पुईखडीवर रिंगण सोहळा झाला.
रिंगण सोहळा झाल्यानंतर दिंडीने नंदवाळकडे प्रयाण केले. ही दिंडी नंदवाळमध्ये पोहोचल्यानंतर तेथील विठ्ठल मंदिराभोवती दिंडीतील सर्वांनी ज्ञानेश्वरांची मूर्ती व पादुकांसोबत घेऊन हरिनामाचा जप करत प्रदक्षिणा घातली. यानंतर मंदिरात जाऊन ज्ञानेश्वरांच्या मूर्तीचा हार विठ्ठलाच्या चरणी तर विठ्ठलाचा हार ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करुन विठ्ठलाची आरती केली. दरम्यान, सकाळी 8 वाजता मिरजकर तिकटीजवळील विठ्ठल मंदिराजवळ मान-अपमान गोवे…अवघे गुंडूनी ठेवावे…हें चि देवाचें दर्शन सदा राहे समाधान हा वारकऱयांनी अभंग म्हंटल्यानंतर पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे, सुहास सोरटे, माजी नगरसेवक सचिन चव्हाण व अजित चव्हाण यांच्या हस्ते दिंडीचा प्रारंभ केला. यावेळी माऊली पालखी भक्त मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब पोवार, उपाध्यक्ष दीपक गौड, चोपदार आनंदराव लाड महाराज, देवकर महाराज, प्रवचनकार एम. पी. पाटील-कावणेकर, ऍड. राजेंद्र किंकर आदी उपस्थित होते.
दिंडीने नंदवाडकडे प्रस्थान करताच पावसाची हजेरी लागली. पण त्याचा व्यत्यय न समाजता ही दिंडी 5 बैलगाडय़ा, माऊलीचे दोन अश्व, भजनी मंडळे, टाळकरी, विणेकरी, तुळशी वृंदावन डोक्यावर घेतलेल्या महिला, फुलांनी सजवलेला माऊलींचा रथ, या रथातील चांदीच्या पालखीत विराजमान केलेली ज्ञानेश्वरांची मूर्ती व पादुका, हातात दिंडय़ा पताका घेतलेले भक्त अशा लवाजम्यासह बिनखांबी गणेश मंदिर, निवृत्ती चौक, उभा मारुती चौक मार्गे खंडोबा तालीमजवळ गेली. येथे तालमीच्या वतीने दिंडीचे स्वागत केल्यानंतर तालमीसमोर उभे रिंगण सोहळा साजरा केला. यानंतर दिंडीतील सर्वांना तालमीच्या वतीने प्रसाद वाटप झाल्यानंतर दिंडी पुन्हा मार्गस्थ होऊन ती जुना वाशी नाका, क्रशर चौक, सानेगुरुजी वसाहत, आपटेनगरमार्गे पुईखडी येथे पोहोचले. येथेही परंपरेनुसार गोलरिंगण सोहळा आयोजित केला. या सोहळ्यात माऊलीच्या अश्वांनी पाच फेऱया मारुन रिंगण पूर्ण केल्यानंतर दिंडीने नंदवाळच्या दिशेने प्रस्थान केले.
हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत अश्वांचे पुजन…
दुपारी दीडच्या सुमारास पुईखडीवर गोलरिंगण सोहळा आयोजित केला. तत्पूर्वी आमदार जयश्री जाधव यांच्या हस्ते पालखीतील ज्ञानेश्वरांच्या मूर्तीची आरती करण्यात आली. यानंतर आमदार ऋतुराज पाटील, निवृत्त पोलीस उपअधीक्षक आर. आर. पाटील, माजी नगरसेवक शारंगधर देशमुख, बापुसाहेव पोवार यांच्या हस्ते संग्राम व पवन या दोन माऊलीच्या अश्वांचे पुजन केले. यानंतर माऊलीच्या अश्वांनी पाच फेऱया मारुन रिंगण पूर्ण करताच ज्या ठिकाणी अश्वांनी आपली पाऊले टाकली होती तेथील माती कपाळी लावण्यासाठी भक्तांची एकच झुंबड उडाली होती.
भाविकांची मंडळाकडून पोटपूजा…
पायी चालून काहीसे थकून गेलेल्या दिंडीतील सर्वांना 30 ते 35 मंडळे, संस्था, उद्योजक व कंपन्यांकडून खिचडी, राजगिरा लाडू, केळी, दुधांचे वाटप करण्यात आले. या वाटप कार्यासाठी शिवाजी पेठेतील जुनी बलभीम बँकेपासून ते अगदी पुईखडीपर्यंत मंडळे व संस्थांनी मंडप उभा केले होते. राधेय ग्रुप व एकजुटी तरुण मंडळाने तर तब्बल 5 हजारहून अधिक भाविकांना उपवासाचे पदार्थ वाटप केले.
दिंडी मार्गाची स्वच्छता…
शिवाजी पेठेतील भक्तीगंध सेवा प्रतिष्ठानच्या वतीने संपूर्ण दिंडी मार्गात स्वच्छता उपक्रम राबवण्यात आला. त्यासाठी प्रतिष्ठानच्या 30 कार्यकर्त्यांनी श्रमदान केले. यामध्ये त्यांनी दिंडी मार्गातील 40 पोती प्लास्टिकसह केळाच्या साली, वेपर्सची पाकिटे, ग्लास, प्लेटस् व अन्य कचरा गोळा केला. उभा मारुती चौकापासून ते पुईखडी या मार्गात हा स्वच्छता उपक्रम राबवण्यात आला, असे प्रतिष्ठानच्या अध्यक्ष नारायणी पुजारी यांनी सांगितले.