मुंबई \ ऑनलाईन टीम
गेल्या वर्षभरात कोकणाला तिसऱ्यांदा नैसर्गिक संकटाचा फटका बसला आहे. त्यामुळे आतातरी सरकारने कोकणाला मदत द्यावी, असे वक्तव्य राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. मुसळधार पावसामुळे कोकणातील अनेक भागांमध्ये सध्या पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की, कोकणातील परिस्थिती भीषण आहे. गेल्या वर्षभरात कोकणाला बसलेला हा तिसरा फटका आहे. यापूर्वी निसर्ग आणि तौक्ते चक्रीवादळावेळी राज्य सरकारने कोकणाला मदत केली नाही. किमान आतातरी मदत द्यावी. तसेच आवश्यक त्या सर्व यंत्रणा मदतीसाठी तयार ठेवाव्यात.
रात्रभर झालेल्या ढगफुटीमुळे चिपळूण जलमय बनले आहे. पावसामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. वाशिष्ठी आणि शिव नदीला आलेल्या पुराने चिपळूण शहर जलमय झाले असून 2005 पेक्षाही अधिक प्रमाणात पूर आला आहे. शहरातील बाजारपेठ, खेर्डीमध्ये सात फुटांपेक्षा जास्त पाणी शिरले असून अख्खी बाजारपेठ पाण्याखाली आहे. याशिवाय शेकडो घरांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. मुंबई- गोवा महामार्ग, कराड रोड मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. तर शहरातील ब्रिटिशकालीन बहादूर शेख पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. अनेक घरांमध्ये छपरापर्यंत पाणी आल्याने शेकडो लोक पाण्यात अडकले आहेत.