24 जिल्हय़ांना फटका ः 2 लाखांहून अधिक लोक प्रभावित
वृत्तसंस्था / गुवाहाटी
आसाममध्ये पुरामुळे स्थिती बिघडली असून राज्याच्या कछार, चराईदेव, दरांग, धेमाजी, डिब्रूगढ आणि दीमा हसाओसमवेत 24 जिल्हय़ांमध्ये आतापर्यंत 2,02,385 लोक प्रभावित झाले आहेत. तर पूर आणि भूस्खलनामुळे आतापर्यंत 7 जणांना जीव गमवावा लागला आहे. तर हवामान विभागाने केरळच्या 4 जिल्हय़ांमध्ये अतिवृष्टीचा अलर्ट जारी केला आहे.
पर्वतीय जिल्हा असलेल्या दीमा हसाओचा राज्यातील उर्वरित हिस्स्यांसोबतचा संपर्क भूस्खलनामुळे तुटला आहे. संपर्कव्यवस्था पूर्णपणे बंद असून हाफलोंगच्या दिशेने जाणारे सर्व रस्ते आणि रेल्वेमार्ग 15 मेपासून बंद असल्याचे आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सांगितले आहे.
सातत्याने पाऊस पडत असल्याने अनेक जिल्हय़ांमधील रस्ते, पूल वाहून गेले आहेत. पिकांचे अतोनात नुकसान झाले असून अनेक नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. कछार जिल्हय़ात पुरामुळे दोन जणांचा मृत्यू झाला तर दीमा हसाओमध्ये भूस्खलनामुळे तीन जणांना जीव गमवावा लागला.
652 गावांना फटका
पुरामुळे 20 जिल्हय़ांमधील एकूण 652 गावांना फटका बसला आहे. लोकांना दिलासा देण्यासाठी 7 जिल्हय़ांमध्ये सुमारे 55 मदत शिबिरे सुरू करण्यात आलीअसून यात 32,959 लोकांना आश्रय देण्यात आला आहे. एनडीआरएफ, सैन्य, एसडीआरएफचे जवान पूरग्रस्त भागांमध्ये बचाव अन् मदतकार्य करत आहेत.
केरळमध्ये मुसळधार पाऊस
हवामान विभागाने केरळमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला असून मलप्पुरम, कोझीकोड, कन्नूर आणि कासरगोड जिल्हय़ांकरता ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर अन्य सर्व जिल्हय़ांकरता यलो अलर्ट जारी करण्यात आला. मच्छिमारांना समुद्रात न उतरण्याची सूचना करण्यात आली आहे. याचबरोबर अनेक भागांमध्ये पूरस्थितीचा इशारा देण्यात आला आहे.
पूरसंकटाची भीती
कोट्टायममध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन प्रभावित झाले असून नद्यांनी धोकादायक पातळी गाठली आहे. विजेच्या वाहिन्यांचे नुकसान झाले असून पिकांची हानी झाली आहे. याचदरम्यान केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी मान्सूच्या तयारीवरून आरोग्य विभागासोबत बैठक घेतली आहे. मुख्य सचिवांनी जिल्हाधिकाऱयांना खबरदारीदाखल पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत.