बलूचिस्तानात सर्वाधिक संकट
वृत्तसंस्था / इस्लामाबाद
एक महिन्यापूर्वीपर्यंत उष्मालाटेला सामोरा जाणारा पाकिस्तान आता पूर आणि पावसामुळे बेहाल झाला आहे. पाकिस्तानात पुरामुळे आतापर्यंत 77 जणांना जीव गमवावा लागला आहे. देशाचे हवामान बदल विषयक मंत्री शेरी रहमान यांनी आणखी काही दिवस पाऊस सुरूच राहणार असल्याचा इशारा दिला आहे.
हे एक राष्ट्रीय संकट आहे. देशात 14 जून रोजी मान्सूनने धडक दिल्यापासून आतापर्यंत 77 जणांचा मृत्यू ओढवला आहे. ही तर मान्सूनची सुरुवात असल्याने आम्हाला पुढील काळासाठी तयारी करावी लागणार असल्याचे मंत्र्यांनी म्हटले आहे. सर्वाधिक जीवितहानी बलुचिस्तानच्या दक्षिण-पश्चिम भागात झाली आहे. तेथे 39 लोकांचा पुराच्या पाण्यात बुडून किंवा वीजेचा धक्का लागून मृत्यू झाला आहे. पाकिस्तानात एकेदिवशी दुष्काळ असतो, तर दुसऱया दिवशी पुराचे संकट घोंगावू लागते. यातून पाकिस्तान किती गंभीर स्थितीत आहे याचा अंदाज लावता येतो असे उद्गार शेरी रहमान यांनी काढले आहेत.