संभाजी भिडे गुरुजी यांचे प्रतिपादन : विशाळगड-पन्हाळगड धारातीर्थ मोहिमेची सांगता : 20 हजार धारकऱयांचा सहभाग
प्रतिनिधी /पन्हाळा
आळंदी ते पंढरपूरकडे जाणारा प्रवाह हा आत्मउद्धार, आत्मोन्नती, आत्मसाक्षात्कारासाठी आहे. छत्रपती संभाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याचा प्रवाह हा राष्ट्रउद्धार, राष्ट्रउन्नती, राष्ट्रसाक्षात्कार यासाठीच आहे, असे प्रतिपादन शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी केले.
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने विशाळगड ते पन्हाळगड या धारातीर्थ यात्रेच्या अडतिसाव्या मोहिमेची किल्ले पन्हाळगडावर सांगता झाली. यावेळी ते मोहिमेत सहभागी धारकऱयांना मार्गदर्शन करताना बोलत होते.
राष्ट्रउद्धार व उन्नतीच्या जागरासाठी आपणाला धारकरी प्रवाह संपूर्ण हिंदुस्थानात निर्माण करावयाचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले हिंदवी स्वराज्य सिंहासन दिल्लीत कोणाचेही, कोणत्याही पक्षाचे सरकार असो आपणाला स्वराज्य शासन-प्रशासन निर्माण करावयाचे आहे. हिंदवी स्वराज संस्कृती, न्याय आणि तत्त्वप्रिय तसेच धर्मप्रिय आहे. महाराष्ट्रातील 361 तालुक्यांत येत्या दुर्गामाता दौड (नवरात्र) पर्यंत खडा पहारा मोहीम धारकऱयांनी पूर्ण करावयाची आहे. मातीत एक पेरलेला दाणा हजार दाणे निर्माण करतो अगदी तसेच आपण या भारतमातेचा संसार टिकावा म्हणून आपले योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. विशाळगडावरून पन्हाळा येथे वीस हजारांहून अधिक धारकरी या 38 व्या धारातीर्थ मोहिमेत सहभागी झाले होते. यामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, छत्तीसगड, आंध्रप्रदेश आदी राज्यांतून धारकरी सहभागी झाल्याची माहिती संघटनेचे प्रदीप बाफना यांनी दिली. यावेळी ऍड. दुर्गे (पुणे), डॉ. देशपांडे, रावसाहेब देसाई, अनिकेत हिरवे, अविनाश सावंत, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्यवाह बाळासो बेडग आदी मोहिमेत उपस्थित होते.बंदोबस्तासाठी पोलीस तैनात केले होते.