रोजगार हमीची जोड, बागायततर्फे सहा हजार रोपांची लागवड
प्रतिनिधी /बेळगाव
बागायत खात्यामार्फत मागील दोन वर्षात विविध ठिकाणी फळरोपांची लागवड झाली आहे. समाधानकारक पाऊस आणि पोषक वातावरणामुळे लावलेल्या रोपांची जोमाने वाढ झाली आहे. त्यामुळे फळबागा आता फुलू लागल्या आहेत. मच्छे येथील निराश्रित केंद्रात रोजगार हमी योजनेंतर्गत पाच ते सहा हजार फळरोपांची लागवड केली होती. ही रोपे आता डोलू लागली आहेत. शिवाय येत्या वर्षभरात विविध फळांनी बहरणार आहेत, अशी माहिती बागायत खात्याच्या अधिकाऱयांनी दिली.
बागायत खात्याने रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्हय़ातील सरकारी शाळा, प्राथमिक आरोग्य केंदे, पशुवैद्यकीय केंद्रे, सरकारी जागा, ग्राम पंचायत, वसतीगृहे, निराश्रित केंद्रे आदी ठिकाणी फळरोपांची लागवड केली आहे. यामध्ये आंबा, फणस, पेरू, सीताफळ, लिंबू, नारळ, जांभूळ, शेवगा, डाळिंब, पपई, कडीपत्ता आदी रोपांचा समावेश होता. दरवषी पावसाळय़ाच्या तोंडावर वनमहोत्सव आणि इतर कार्यक्रम राबवून हजारो रोपांची लागवड केली जाते. यामध्ये बागायत खात्याने फळरोप लागवडीला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे विविध ठिकाणी फळरोपांची लागवड झाली आहे. त्यामुळे भविष्यात शाळा, सरकारी कार्यालये आणि इतर ठिकाणी फळांची झाडे बहरताना दिसणार आहेत. पर्यावरणाचे संवर्धन व्हावे व स्थानिकांना विविध फळे उपलब्ध व्हावीत, याकरिता विविध फळ झाडांची लागवड केली आहे. विशेषतः स्थानिक वातावरणात पोषक ठरणाऱया झाडांची लागवड झाली आहे.
मागील दोन वर्षात दमदार पाऊस झाल्याने लागवड झालेली संपूर्ण रोपे बहरली आहेत. याबरोबरच नागरिकांना प्रोत्साहन देण्यासाठी रोपबाजार भरवून विविध फळ-पुष्पांची रोपे सवलतीच्या दरात दिली जातात. त्यामुळे दरवषी फळ आणि पुष्प रोपांची संख्या वाढत आहे.
मच्छे वसतीगृहात दोन वर्षांपूर्वी लावलेली फळांची रोपे जोमाने आली आहेत. येत्या वर्षभरात सर्व झाडांना फळ लागवड होईल. याबरोबरच शाळा आणि इतर ठिकाणी देखील रोपे लावण्यात आली आहेत. त्यामुळे स्थानिक स्तरावर विविध फळांची चव चाखता येणार आहे.
– प्रवीण महेंद्रकर (साहाय्यक संचालक बागायत खाते)