पर्यावरणमंत्र्यांच्या परिषदेत मोदींचे प्रतिदान
वृत्तसंस्था / गांधीनगर
गुजरातच्या एकता नगरमध्ये पर्यावरण मंत्र्यांच्या राष्ट्रीय संमेलनाला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवारी व्हर्च्युअली संबोधित केले आहे. भारताने 2070 पर्यंत नेट झिरोचे लक्ष्य बाळगले आहे. आता देशाचे लक्ष ‘ग्रीन ग्रोथ’ आणि ‘ग्रीन जॉब्स’वर आहे. हे लक्ष्य गाठण्यासाठी प्रत्येक राज्याच्या पर्यावरण मंत्रालयाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
या परिषदेत बोलताना मोदींनी भूजलाच्या खालावत चाललेल्या पातळीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. ज्या राज्यांमध्ये पाण्याचे मुबलक प्रमाण असायचे, तेथे भूजलपातळी अधिक असायची, परंतु या राज्यांना आता पाण्याच्या टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. हे आव्हान केवळ पाण्याशी निगडित विभागाचे नसून पर्यावरण विभागालाही हे मोठे आव्हान असल्याचे समजून घ्यावे लागणार असल्याचे पंतप्रधान म्हणाले.
भारत पुढील 25 वर्षांसाठी नवी लक्ष्य निश्चित करत आहे. सर्वांच्या प्रयत्नांमुळे पर्यावरणाच्या रक्षणात मदत मिळेल आणि भारताचा विकास वेगाने होईल असा विश्वास आहे. आताचा नवा भारत, नवी विचारसरणी अन् नव्या दृष्टीकोनासह वाटचाल करत आहे. भारत आता वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था देखील आहे आणि निरंतर स्वतःची भूमिका मजबूत करत असल्याचे मोदींनी म्हटले आहे.
राज्यांमध्ये सर्क्युलर इकॉनॉमीला अधिकाधिक चालना देण्याचे आवाहन मी सर्व राज्यांच्य पर्यावरण मंत्र्यांना करू इच्छितो. यामुळे ठोस कचरा व्यवस्थापन आणि सिंगल युज प्लास्टिकपासून मुक्तीच्या आमच्या मोहिमेला बळ मिळणार आहे. देशाच्या वनाच्छादनात वाढ झाली असून सरोवर अन् तलावांची कक्षा वेगाने वाढत आहे. उद्दिष्ट अन योगदान पूर्ण करण्याच्या आमच्या पार्श्वभूमीमुळेच जग आता भारतासोबत जोडला जात आहे. मागील काही वर्षांमध्ये सिंह, वाघ, हत्ती, गेंडे तसेच बिबटय़ांच्या संख्येत वाढ झाली आहे. चित्त्यांच्या घरवापसीमुळे नवा उत्साह संचारला असल्याचे पंतप्रधान म्हणाले.
अर्बन नक्षलींमुळे नुकसान
पर्यावरणाच्या नावावर विकासाचे प्रकल्प विनाकारण ठप्प करू नयेत असे म्हणत त्यांनी सरदार सरोवर धरणाचे उदाहरण दिले. अर्बन नक्षलींनी अनेक वर्षांपर्यंत धरणाच्या निर्मितीकार्यात अडथळे निर्माण पेले होते. देशाला स्वातंत्र्य मिळताच सरदार सरोवर धरणाचे काम सुरू झाले. पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी या कामाचा शुभारंभ केला होता, त्यानंतर अर्बन नक्षली सक्रीय झाले आणि नर्मदा नदीवर निर्माण होणारे धरण पर्यावरणाला नुकसान पोहोचविणारे असल्याचा दावा करत त्यांनी हे काम रोखले. यामुळे हे धरण तयार करण्यास कित्येक दशके लागली, याचे उद्घाटन मी पंतप्रधान झाल्यानंतरच होऊ शकले. यामुळे मोठय़ा प्रमाणात निधी विनाकारण खर्च झाल्याचे मोदींनी म्हटले आहे.
कट हाणून पाडा
शहरी नक्षली अद्याप सक्रीय आहेत. पर्यावरणाच्या नावावर अनावश्यक स्वरुपात प्रकल्प ठप्प होऊ नयेत अशी विनंती करतो. शहरी नक्षलींच्या कटाला हाणून पाडण्यासाठी आमच्याकडे एक संतुलित दृष्टीकोन असायला हवा असे त्यांनी नमूद केले आहे.