वृत्तसंस्था/ म्युनिच
आगामी पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी येथे शनिवारपासून सुरु होणाऱ्या आयएसएसएफ विश्वचषक पिस्तुल आणि रायफल नेमबाजी स्पर्धेत भारतीय नेमबाजांच्या कामगिरीवर अधिक लक्ष राहिल.
अलिकडेच नवी दिल्ली आणि भोपाळमध्ये घेण्यात आलेल्या जवळपास महिन्याभराच्या कालावधीतील निवड चाचणी नेमबाजी स्पर्धेमध्ये अनेक अव्वल नेमबाजांनी आपला सहभाग दर्शविला होता. दरम्यान शनिवारपासून सुरु होणाऱ्या या स्पर्धेत अनेक भारतीय नेमबाजांनी अधिक दमछाक झाल्याने सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. सदर नेमबाज आता ऑलिम्पिक तयारीवर अधिक भर देत आहेत. दरम्यान भारतीय नेमबाजांसाठी म्युनिचमधील ही विश्वचषक नेमबाजी स्पर्धा सक्तीची राहिल, असे अखिल भारतीय रायफल संघटनेच्या प्रवक्त्याने सांगितले. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळविण्यासाठी भारतीय नेमबाजांसाठी ही स्पर्धा म्हणजे शेवटची संधी राहिल. या स्पर्धेमध्ये पुरुष आणि महिलांच्या 10 मी. एअर रायफल नेमबाजी प्रकाराचा समावेश राहिल. या दोन्ही प्रकारातील अंतिम लढती येत्या सोमवारी होतील. पुरुषांच्या विभागात भारताचे संदीप सिंग, अर्जुन बबुटा आणि रुद्रांक्ष पाटील तर महिलांच्या विभागात इलाव्हेनिल वलरिवन, रमिता व तिलोत्तमा सेन सहभागी होत आहेत.