शिक्षिकेवरील जीवघेण्या हल्ल्याला काही तास उलटत नाहीत तोच काश्मीरमधील कुलगाम जिल्हय़ात अतिरेक्यांनी एका बँक कर्मचाऱयाची गोळय़ा घालून हत्या केल्याने निसर्गाचे वरदान लाभलेल्या नंदनवनावरील दहशतवादाची छाया आणखी गडद झाली आहे. प्रत्येक भारतीयाच्या हृदयात काश्मीरचे आगळेवेगळे स्थान असून, जगभरातील पर्यटकांचे आवडीचे स्थळ म्हणून या भूमीकडे पाहिले जाते. मात्र, गोळीबार, बॉम्बस्फोट व दहशतवादी कारवायांमध्येच हा नितांतसुंदर परिसर व तेथील माणसे वर्षानुवर्षे भरडताना दिसतात. भूतकाळानंतर आता वर्तमानही रक्तरंजित बनू लागल्याने काश्मीर व तेथील नागरिकांचे भवितव्य काय असणार, हा प्रश्न आजमितीला अधिक ठळक झाला आहे, असे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही. वास्तविक 370 कलम हटविल्यानंतर काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित होईल, नंदनवन पुन्हा एकदा फुलून जाईल, या सौंदर्यभूमीत मनसोक्त बागडता येईल, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात दहशतवाद्यांच्या कारवायांनी मागच्या काही दिवसांत टोक गाठल्याचे दिसत आहे. गेल्या महिनाभरात दहशतवाद्यांनी तब्बल आठ जणांची केलेली हत्या, हेच दर्शविते. तीनच दिवसांपूर्वीच अतिरेक्यांनी रजनी बाला या सरकारी शिक्षिकेची हत्या केली. या हत्येने काश्मीरचा परिसर हादरलाच. परंतु, रजनी यांच्याकडून अध्यापनाचे धडे घेणाऱया कितीतरी विद्यार्थिनींच्या मनाला जो हादरा वा धक्का बसला आहे, त्यातून सावरणे ही बाब अत्यंत कठीण म्हणावी लागेल. तत्पूर्वी तहसील कार्यालयातील लिपिक राहुल भट तसेच काश्मीर पंडित अभिनेत्री आमरिन भट यांची हत्या असो वा बडगाममध्ये दोन कामगारांवर झालेला गोळीबार असो. यातून हल्लासत्र सुरूच असल्याचे पहायला मिळत आहे. या ‘टार्गेट किलिंग’मध्ये शेकडो नागरिकांचे बळी जात असून, मागच्या काही दिवसांत अनेक जवान व पोलिसांनाही आपले प्राण गमवावे लागले आहेत. यंदाच्या वर्षाचा विचार करता पोलीस अधिकारी, शिक्षक, सरपंच व सरकारी सेवेतील 17 नोकरदारांच्या हत्या झाल्या आहेत. मे महिन्यातील जवळपास 15 चकमकींमध्ये 27 दहशतवाद्यांचा खातमा करण्यात यश मिळाले असले, तरी ज्या पद्धतीने निरपराध नागरिकांचे बळी जात आहेत, ते चिंताजनकच होय. अमरनाथ यात्रेआधीच परिस्थिती अशा प्रकारे चिघळू लागल्याने नक्कीच सरकारपुढील चिंतेत भर पडल्याचे दिसून येते. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बोलविलेल्या बैठकीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, ‘रॉ’चे प्रमुख सामंत गोयल, आयबीचे प्रमुख अरविंद कुमार यांच्यात या विषयावर सर्वंकष चर्चा झाली. या चर्चेचा तपशील समजू शकला नसला, तरी हे सत्र रोखण्याकरिता कोणत्या उपाययोजना आखता येतील, सुरक्षा यंत्रणा कशी अधिक मजबूत करता येईल, यावर नक्कीच सदर बैठकीत ऊहापोह झाला असणार. आता दोन पावले पुढे टाकून या प्रश्नाला भिडावे लागेल. काश्मीर हा संवेदनशील टापू म्हणूनच आजही ओळखला जातो. किंबहुना, काश्मिरी पंडित व अल्पसंख्यांक हिंदू समाजाला टार्गेट करून दहशत माजविण्याचा प्रयत्न अतिरेक्यांकडून होत आहे. त्यामुळे हे दहशतीचे वातावरण आधी कसे संपविता येईल, यादृष्टीने पावले पडायला हवीत. काश्मीर खोऱयात नियुक्त केलेल्या शेकडो सरकारी कर्मचाऱयांनी मोर्चा काढत या मुद्दय़ाकडे लक्ष वेधले आहे. सरकार हत्या थांबविण्यात आणि सुरक्षित वातावरण देण्यात अपयशी ठरल्याचे त्यांचे म्हणणे आहे. आम्ही कामावर जाणार नाही, मूळ जिल्हय़ात त्वरित बदली करावी, असा पवित्राच या कर्मचाऱयांनी घेतला आहे. जी वाच्या भीतीने अनेक काश्मिरी पंडित आणि हिंदू नागरिक खोऱयातून बाहेर पडण्यासाठी धडपडत आहेत. या मंडळींनी तसेच सरकारी कर्मचाऱयांनी खोरे सोडायलाही सुरुवात केली आहे. ही अत्यंत चिंतेची बाब ठरते. कर्मचारी व नागरिकांमधील असंतोष असाच वाढत राहिला व त्यांनी येथून परतणेच पसंत केले, तर त्याचे दूरगामी परिणाम होऊ शकतात. म्हणूनच याची केंद्र सरकारने अत्यंत गंभीरपणे दखल घ्यायला हवी. जम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट आहे. त्यामुळे अंतिमतः केंद्रालाच याची जबाबदारी घ्यावी लागेल. 1990 च्या दशकातही काश्मिरी पंडितांना अशाच रक्तरंजित परिस्थितीतून जावे लागले. हजारो पंडितांवर विस्थापित होण्याची वेळ आली. आज त्याच नको त्या इतिहासाची पुनरावृत्ती होत असेल, तर त्याच्यासारखे दुसरे दुःख नाही. 370 हटविल्याने काश्मीरमध्ये उद्योग, रोजगारनिर्मिती होण्यासह सुरक्षित वातावरण तयार होईल, काश्मिरी पंडितांच्या जीवनाला नवे वळण मिळेल, येथपासून ते काश्मिरात जागा घेता येण्यासह कितीतरी गोष्टी कानावर येत होत्या. प्रत्यक्षात ते स्वप्न ठरू नये, याचीच आता आपल्याला काळजी घ्यावी लागणार आहे. भारताला पाकिस्तानचा शेजार आहे. दहशतवाद्यांना हाताशी धरून जम्मू-काश्मिरसह संपूर्ण भारतातील वातावरण अस्थिर कसे ठेवता येईल, हाच एक पाकचा अजेंडा असतो. भिकेकंगाल झाल्यानंतरही पाकच्या या धोरणात तिळमात्र बदल झालेला नाही. हे पाहता सुरक्षा व गुप्तहेर यंत्रणांना आगामी काळात अधिक सतर्कतेने काम करावे लागेल. केवळ एखाद्या सर्जिकल स्ट्राईकने हा प्रश्न मिटणारा नाही. अनेक पातळय़ांवर लढण्याबरोबरच दहशतवाद्यांचे या परिसरातील जाळे समूळ कसे मोडून काढता येईल, यावर कटाक्ष ठेवायला हवा. पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे पोलादी नेतृत्व आज देशाला लाभले आहे. काश्मीर हा या दोघांच्याही जिव्हाळय़ाचा विषय आहे. त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली येथील हत्यासत्र व दहशतवाद रोखण्याकरिता पुढच्या काही दिवसांत नक्कीच कठोर पावले उचलली जातील, यात संदेह नाही. विरोधकांनीही परिस्थिती हाताबाहेर गेली आहे वगैरे, अशी सवंग विधाने करू नयेत. त्याऐवजी केंद्र सरकारला साथ द्यावी. काश्मीरचा प्रश्न गुंतागुंतीचा असून, तो अतिशय कौशल्यानेच हाताळावा लागेल. तसा तो हाताळला जाऊन काश्मीरमध्ये शांतता नांदावी नि काश्मिरी पंडितांसह सर्वांचे जीवन सुरक्षित व्हावे, हीच तमाम भारतीयांची इच्छा आहे.
Previous Articleकोको गॉफला दुहेरी मुकुटाची संधी
Next Article डॅरेल मिशेल, ब्लंडेलने न्यूझीलंडचा डाव सावरला
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.