खडेबाजार पोलीस स्थानकात शांतता बैठक : नियमांचे पालन करण्याचे आवाहन
बेळगाव : लोकमान्य टिळक यांनी सार्वजनिक गणेश उत्सवाला सुरुवात केली. कारण भारत गुलामगिरीत होता. त्या गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी देशातील जनता एकवटली पाहिजे, हा त्यामागचा उद्देश होता. कारण देशाला स्वातंत्र्य मिळून घ्यायचे असेल तर इंग्रजांच्याविरोधात चळवळ उभारणे गरजेचे होते. यासाठीच सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. मात्र आता गणेशोत्सवाचा मूळ उद्देशच बदलत चालला असून प्रत्येक तरुणाने त्याचे आत्मचिंतन करावे. सप्टेंबर महिन्यात होणारा गणेशोत्सव कायदा व सुव्यवस्थेचे पालन करत शांततेत आणि उत्साहात साजरा करावा, असे आवाहन खडेबाजार पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक दिलीप निंबाळकर यांनी केले.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खडेबाजार पोलीस स्थानकाच्या हद्दीतील सर्व सार्वजनिक गणेशोत्सवांच्या पदाधिकाऱ्यांची शुक्रवारी खडेबाजार पोलीस स्थानकामध्ये शांतता बैठक घेतली. त्यामध्ये त्यांनी तरुणांना आवाहन केले आहे. गणेशोत्सवाचा समाज प्रबोधनासाठी उपयोग व्हावा. कर्कश आवाजांच्या डॉल्बीमुळे साऱ्यांनाच त्रास होत आहे. तेव्हा पोलीस प्रशासनाने दिलेल्या नियमातच डॉल्बी लावावी. विद्युत कनेक्शन घेताना तसेच मंडपावर रोषणाई करताना योग्य काळजी घ्या. रात्री उशिरापर्यंत स्पीकर लावू नका. गणेश विसर्जन मिरवणूकसुद्धा वेळेत काढा, प्रत्येक मंडपामध्ये सीसीटीव्ही लावा, अग्निशमन उपकरणे मंडपात ठेवा, अधिक उंचीच्या गणेशमूर्ती करू नका, पोलिसांना सहकार्य करा, यासह इतर नियम सांगून त्यांचे पालन करा, असे आवाहन त्यांनी केले आहे. यावेळी व्यासपीठावर रणजित चव्हाण-पाटील, पोलीस उपनिरीक्षक आनंद अंटगुडे आदी उपस्थित होते. बैठकीला कपिलेश्वर चौक, गणपत गल्ली, गणाचारी गल्ली, गोंधळी गल्ली, समादेवी गल्ली, काकतीवेस, हुतात्मा चौक, केळकर बाग, भांदूर गल्ली, कंग्राळ गल्ली, पाटील गल्ली यासह शहरातील इतर गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.