नवी दिल्ली / वृत्तसंस्था
राहुल गांधी यांच्या पदयात्रेत कोरोना नियमावलीचे पालन केले जाणार आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीत ही यात्रा सुरु राहणार आहे, असे प्रतिपादन काँगेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शिद यांनी केले आहे. कोरोना नियमावलीचे पालन करा, अथवा यात्रा थांबवा असे आवाहन बुधवारी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी केले होते. त्यावर खुर्शिद बोलत होते.
यात्रेत सर्व दक्षता घेण्यात येईल. मात्र यात्रा थांबणार नाही. आम्ही कोणत्याही परिस्थितीत यात्रा पूर्ण करणारच. कोणत्याही डावपेचाला आम्ही बळी पडणार नाही. लोकशाहीत प्रत्येक पक्ष आणि व्यक्तीला त्याचे मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. सरकार काँगेसच्या पदयात्रेला घाबरले आहे. त्यामुळे ते अनेक आदेश काढण्याचा आणि पत्रे पाठविण्याचा प्रयत्न करीत आहे. ज्यांना कोरोनाची भीती वाटली नाही ते यात्रेला घाबरले आहेत. आम्ही कोणतीही सूचना अगर पत्र गांभीर्याने घेणार नाही. यात्रा होईलच, असे प्रतिपादन त्यांनी केले.
प्रियांका गांधी समाविष्ट होणार
ही यात्रा सध्या हरियाणात आहे. त्यानंतर ती तीन दिवस उत्तर प्रदेशातून जाणार आहे. या तीन दिवसांमध्ये प्रियांका गांधी यात्रेत पूर्णवेळ समाविष्ट होणार आहेत. उत्तर प्रदेशातील गाझियाबाद आणि लोनी या जिल्हय़ांमधून ही यात्रा जाणार आहे. किमान 11 हजार काँगेस कार्यकर्ते उत्तर प्रदेशात या यात्रेत सहभागी होणार आहेत, अशीही माहिती सलमान खुर्शिद यांनी दिली आहे.