प्रतिनिधी /फोंडा
केंद्रातील मोदी सरकारला आठ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल देशभर सुरु असलेल्या सेवा सुशासन व गरीब कल्याण म्हणजेच सेवा पर्वाचा भाग म्हणून फोंडा भाजपा मंडळातर्फे गरीब कल्याण संमेलन आयोजित करण्यात आले. शांतीनगर-फोंडा येथील रुक्मिणी सभागृहात झालेल्या या संमेलनाला फोंडय़ाचे आमदार व कृषीमंत्री रवी नाईक, राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, प्रदेश भाजपाचे सरचिटणीस ऍड. नरेंद्र सावईकर, फोंडा पालिकेचे नगराध्यक्ष रितेश नाईक, इतर मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष ऍड. मनोहर आडपईकर, फोंडा भाजपा मंडळाचे अध्यक्ष विश्वनाथ दळवी, कुर्टीचे सरपंच दादी नाईक, महिला मोर्चा अध्यक्ष रेश्मा तळावलीकर, दक्षिण गोवा युवा मोर्चा अध्यक्ष शुभम नार्वेकर, नगरसेवक आनंद नाईक आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी बोलताना मंत्री रवी नाईक म्हणाले, केंद्रातील मोदी सरकारने देशातील प्रत्येक घटकाच्या उत्कर्षासाठी विविध योजना राबवून खऱया अर्थाने गरीबांना विकासाच्या प्रवाहात आणले. प्रत्येक कुटुंबापर्यंत वीज, पाणी, शौचालय व गॅस सिलिंडर या प्राथमिक सुविधा पोचविल्या. देशातील एकही गरीब कुटुंब उपाशी राहणार नाही याची हे सरकार काळजी घेत आहे. कोरोनाच्या जागतिक संकटावर मात करताना कुठलीच जात, धर्म व पंथ न पाहता सर्व नागरिकांना मोफत कोरोना प्रतिबंधक लस पुरविली. गोव्याच्या विकासामध्ये केंद्र सरकारचा मोठा वाटा आहे.
मोदी सरकारने राबविलेल्या आत्मनिर्भर भारतच्या पावलावर पाऊल ठेऊन गोव्यातील भाजपा सरकारने स्वयंपूर्ण गोवाचा नारा दिला. भाजपा सरकारची प्रत्येक योजना सामान्य कुटुंबाचा उत्कर्ष साधणारी आहे, असे विनय तेंडुलकर म्हणाले. सेवा, सुशासन व गरीब कल्याण या तत्त्वावरच भाजपा सरकार पुढे जात आहे, असे सांगून या सरकारने गरीबांच्या कल्याणासाठी देशभरात 174 योजना कार्यान्वित केल्याची माहिती ऍड. नरेंद्र सावईकर यांनी दिली. विश्वनाथ दळवी यांनी स्वागतपर भाषणात सरकारच्या विविध योजनांचा आढावा घेतला. रितेश नाईक, मनोहर आडपईकर यांची यावेळी भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद नाईक यांनी तर रेश्मा तळावलीकर यांनी आभार मानले.