उत्तर प्रदेशातील मुझफ्फरहून दिल्लीला जाणारी सप्तक्रांती एक्स्प्रेस गेल्या बुधवारी रात्री साधारणतः 3 वाजता अचानक थांबली. या गाडीच्या एका एसी डब्यातून अचानक जोरदार फायर अलार्म वाजू लागला. त्यामुळे नियमानुसार गाडी थांबवावी लागली. इतर डब्यांमधील लोकही घाबरून जागे झाले. अनेकांनी धडाधड डब्याबाहेर उडय़ा मारल्या. साऱया रेल्वेलाच आग लागली की काय, अशी लोकांची भावना झाली. रेल्वेचा गार्ड आणि ड्रायव्हरही फायर अलार्म वाजणाऱया डब्याकडे धावले. शोधाशोध सुरू झाली. आगीच्या ज्वाळा तर कोठे दिसेनात. मग फायर अलार्म वाजला कसा? याचा शोध सुरू झाला.
शोध घेतल्यानंतर ‘डोंगर पोखरून उंदीर काढणे म्हणजे काय?’ याचा अक्षरशः प्रत्यय आला. या डब्याचा फायर अलार्म चक्क एका उंदराने वाजविला होता. डब्याची अलार्म सिस्टीम उघडून पाहिल्यानंतर आत हे उंदीरमामा दिसून आले. त्यांनीच अलार्म त्यांच्याही नकळत वाजविल्याचे स्पष्ट झाले. सर्वांनी सुटकेचा निःश्वास टाकला. मात्र, या गडबडीत दोन-अडीच तासांचा वेळ वाया गेला होता. प्रवासी मंडळी पुन्हा आपापल्या डब्यांमध्ये परतली आणि रेल्वे पुढच्या प्रवासाला लागली. आपल्या देशात उंदरांचे असे पराक्रम नवे नाहीत. ते दारू पितात, गांजा खातात अशा बातम्या आपल्या परिचयाच्या आहेत. पण एका उंदरामुळे अडीच तास रेल्वे थांबली, ही बातमी मात्र अनोखी आहे. अर्थात भारतातच असे घडू शकते, असेही बोलले जाते. फायर अलार्म वाजवता वाजवता उंदराचाही मृत्यू झाला होता. अखेरीस मेलेल्या उंदराला बाहेर काढून रेल्वेचा पुढचा प्रवास सुरू झाला होता.