लेखी आश्वासन द्या, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा
प्रतिनिधी / बेळगाव
गेल्या अनेक वर्षांपासून ग्राम पंचायतींमध्ये बिल कलेक्टर म्हणून आम्ही काम करत आहे. सरकारच्या नियमानुसार आम्हाला बढती दिली पाहिजे. मात्र बढती देण्यास टाळाटाळ सुरू असल्यामुळे जिल्हय़ातील ग्राम पंचायत कर्मचाऱयांनी जिल्हा पंचायतसमोर धरणे आंदोलन छेडून निदर्शने केली. आम्हाला बढतीसंदर्भात लेखी पत्र द्या, तेव्हाच आंदोलन मागे घेऊ म्हणून कर्मचाऱयांनी दिवसभर ठाण मांडले.
आश्वासनांची पूर्तता करा
ग्राम पंचायतमध्ये 18 ते 20 वर्षे बिल कलेक्टर तसेच इतर कामे करणाऱया कर्मचाऱयांना सरकारने बढती देण्याचे आदेश दिले होते. मात्र कोरोनाकाळात ही प्रक्रिया थांबविण्यात आली होती. त्यानंतर सरकारने नियमानुसार आम्ही तुम्हाला बढती देऊ, असे सांगितले होते. याबाबत जिल्हा पंचायतच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱयांनी यादी तयार झाल्याचे सांगितले होते.
15 सप्टेंबर रोजी ही यादी प्रसिद्ध करण्यात येणार होती. मात्र ती प्रसिद्ध केली गेली नाही. त्यामुळे कर्मचाऱयांनी हे आंदोलन छेडले आहे. सरकारचाच आदेश असल्याने ही बढती प्रक्रिया पूर्ण झाली पाहिजे. मात्र टाळाटाळ करत असल्यामुळे हे आंदोलन छेडण्यात आले आहे. यावेळी जे. एम. जैनेखान, मडय़ाप्पा बजंत्री, यल्लाप्पा नाईक, दुंडाप्पा भजनाईक, मल्लाप्पा आलूर यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.