वार्ताहर/कास
कारगाव ( पिसाडी ) ता. जावली येथील शेतकरी लक्ष्मण बाबुराव माने (वय ६०) हे आपल्या शिवाराची राखण करत असताना त्यांच्यावर रानगव्याने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर त्यांच्यावर सातारा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. या पार्श्वभूमीवर शेतकरी माने यांना वनविभागाकडून एक लाख पंचवीस हजार रुपयांचा धनादेश वनक्षेत्रपाल बाळकृष्ण हसबनीस यांचे हस्ते प्रदान करण्यात आला.
याबाबत चे सविस्तर वृत्त असे की, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील वनपरिक्षेत्र बामणोली अंतर्गत येणारे कारगाव हे अतिदुर्गम गाव आहे. या गावाभोवतीचा संपूर्ण परिसर दाट जंगलाने वेढलेला आहे. त्यामुळे येथे जंगली श्वापदांचा वावर मोठ्या प्रमाणात आढळून येतो. या पूर्वीही येथील अनेक लोकांवर वन्य प्राण्यांचे हल्ले झाले आहेत. मात्र वन्यप्राण्याच्या झालेल्या हल्ल्यात एवढी मोठी मदत मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे असेही येथील ग्रामस्थांनी सांगितले.
सदर शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने त्यांना उपचारादरम्यान रुग्णालयाचा खर्च करणे सुद्धा अवघड झाले होते. यावेळी वनविभागाकडे मदत मिळावी यासाठी त्यांच्या कुटुंबीयांनी तक्रार दाखल केली होती. सदरची मदत तातडीने मिळावी यासाठी वनरक्षक जयंत निकम यांनी शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला होता.
सदरील घटनेची बामणोली वनपरिक्षेत्रातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी गंभीर दखल घेत माने यांना मुख्य वनसंरक्षक नानासाहेब लडकत, उपवनसंरक्षक उत्तम सावंत, सहाय्यक वनसंरक्षक सुभाष बागडी यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल बाळकृष्ण हसबनीस, वनरक्षक जयंत निकम, ग्रामसेवक एस.पी. लोखंडे, कारगावचे वनसमिती अध्यक्ष संदीप सावंत उपसरपंच राजाराम शिंदे व इतर ग्रामस्थांच्या उपस्थितीत हा धनादेश थेट शेतकऱ्याच्या घरी जाऊन सुपूर्द करण्यात आला.
वनक्षेत्रात माणसाचा वाढलेला हस्तक्षेप आणि नवीन अधिवासाच्या शोधात वस्तीत शिरणारे वन्यप्राणी या दोन्ही कारणांमुळे गेल्या काही वर्षात मनुष्य आणि वन्यप्राणी संघर्ष वाढतो आहे. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेअंतर्गत जे लोक वनाच्या आसपास राहतात अशा गावातील लोकांचे वनावरील अवलंबन कमी करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. – बाळकृष्ण हसबनीस, वनक्षेत्रपाल वन्यजीव बामणोली