प्रतिनिधी/ महाबळेश्वर
वन विभागाने सोमवारी धाडसी कारवाई करीत येथील मध्य रेल्वेच्या हॉलिडे होमला टाळे ठाकुन मध्य रेल्वेच्या ताब्यात असलेली वन विभागाची 5 एकर मिळकत आपल्या ताब्यात घेतली. वारंवार नोटीस पाठवुन देखिल मध्य रेल्वेने वन विभागाच्या भाडे पट्टय़ाचे नुतनीकरण केले नाही. त्यामुळे त्यांच्याकडे थकलेल्या लाखो रूपयांच्या वसुलीसाठी अखेर वन विभागास ही कारवाई करावी लागली अशी माहिती वनक्षेत्रपाल श्रीकांत कुलकर्णी यांनी दिली.
वेण्णालेकच्या मागील बाजुस क्षेत्र महाबळेश्वर रस्त्यावर फॉरेस्ट सर्व्हे नंबर 223 मधील पाच एकर जागा 1978 साली मध्यरेल्वेला वन विभागाने पुढील दहा वर्षांसाठी भाडेपट्टा कराराने दिली होती. या जागेत मध्य रेल्वेने आपले हॉलिडे होम बांधले. वन विभाग व मध्य रेल्वे यांच्यात झालेला करार हा 1988 साली संपुष्ठात आला. त्यानंतर मध्य रेल्वेने आपल्या कराराचे नुतनीकरण करणे आवश्यक होते. परंतु त्यांनी ते केले नाही म्हणुन 1998 साली वन विभागाने ही मिळकत कारवाई करून आपल्या ताब्यात घेतली. त्यानंतर रेल्वेने आपला करार वाढवुन घेतला. त्यानंतर वन विभागाने पुन्हा पाच एकर जागा ही मध्य रेल्वेकडे हस्तांतर केली. त्यावेळी केलेल्या कराराची मुदत संपुष्ठात आली. मुदत संपुष्ठात येताच वन विभागाने नोटीसा पाठवुन आपला करार संपला आहे, तो वेळीच नतुनीकरण करून घ्या असे बजावले. परंतु मध्यरेल्वेने वन विभागाने दिलेल्या सुचनेकडे दुर्लक्ष केले. वनक्षेत्रपाल श्रीकांत कुलकर्णी यांनी गेली काही महिने या संदर्भात मध्य रेल्वे बरोबर पुन्हा पत्रव्यवहार सुरू केला व आपला भाडेपट्टा करार संपल्याचे मध्य रेल्वेच्या निदर्शनास आले. काही दिवसांपुर्वी पुन्हा स्मरणपत्र पाठवुन मध्य रेल्वेला कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला. तरीदेखिल मध्य रेल्वेने दुर्लक्ष केले.
अखेर सातारा उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांनी केलेल्या सुचनेनुसार सहा वनसंरक्षक सुधीर सोनावले यांनी मध्य रेल्वेवर कारवाई करण्याचे आदेश दिले. वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार येथील वनक्षेत्रपाल श्रीकांत कुलकर्णी यांनी विशेष पथकासह सोमवारी सकाळी कारवाईसाठी रेल्वे हॉलिडे होमवर पोहोचले. तेथे जे रेल्वे कर्मचारी होते त्यांना त्यांचे सामान घेऊन बाहेर काढले व सर्व हॉलिडे होम ताब्यात घेतले. हॉलिडे होमच्या मुख्य प्रवेशव्दारावर कुलूप लावुन ही पाच एकरची मिळकत सील केली. यावेळी वनक्षेत्रपाल श्रीकांत कुलकर्णी यांच्याबरोबर वनपाल सहदेव भिसे, वनरक्षक लहु राऊत, रमेश गडदे, अभिनंदन सावंत आदी उपस्थित होते.
मध्य रेल्वे प्रमाणेच महाबळेश्वर शहरात परिसरात वन विभागाने भाडेपट्टय़ाने दिलेल्या एकुन 95 मिळकती आहेत. यापैकी बहुतांशी भाडेपट्टय़ाची मुदत संपुष्ठात आलेली आहे. ज्यांच्या भाडेपट्टय़ांच्या मिळकतींचे करार संपुष्टात आलेले आहेत त्यांनी लवकरात लवकर भाडे कराराचे नुतनीकरण करून घ्यावे अन्यथा आपल्या मिळकती देखिल वन विभाग सील ठोकुन आपल्या ताब्यात घेईल, असा इशारा देखील वनक्षेत्रपाल श्रीकांत कुलकर्णी यांनी दिला आहे. वन विभागाच्या या भुमिकेमुळे वन विभागाच्या मिळकतधारकांमध्ये एकच खळबळ माजली असून मिळकतधारकांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.