वार्ताहर /कणकुंबी
खानापूर तालुक्मयातील दुर्गम भागात वसलेल्या गोल्याळी गावातील सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना घेऊन बेळगावच्या ’ऑपरेशन मदत’ ग्रुपतर्फे वनशेतीला प्रारंभ करण्यात आला आहे. हा प्रयोग ग्रामीण शिक्षण अभियानाच्या माध्यमातून राबविण्यात येत असून, याद्वारे पर्यावरणीय समतोल राखला जाईल व अन्य ठिकाणी सेंद्रिय शेतीचा विकास टप्प्याटप्प्याने करण्यात येईल, असे राहुल पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.
लहान वयातच शाळकरी मुलांमध्ये शेतीची आवड निर्माण व्हावी व पर्यावरणात होणारा बदल कळावा, पर्यायाने निसर्गातील सजीव वस्तूवर होणारे दुष्परिणाम काय होतात, याबद्दल शिक्षिका आरती चौगुले यांच्यामार्फत माहिती देण्यात येत आहे. गोल्याळीच्या या विद्यार्थ्यांनी आपल्या घराच्या पारसबागेत भाजीपाला लागवड केलेली आहे, तसेच शाळेच्या आवारात भाजीपाला उगवून त्याचा माध्यान्ह आहारात वापर करण्यात येत आहे. फळझाडे व फुलझाडे लागवड असे अनेक प्रयोग ग्रामीण शिक्षण अभियानाच्या माध्यमातून करण्यात येत आहेत. त्याबद्दल वेळोवेळी सर्वांना कार्यकर्त्यांचे मार्गदर्शन लाभले आहे. असेच सेंद्रिय शेतीचे प्रयोग चिगुळे, आमटे, कणकुंबी, तळावडे तसेच खानापूर व चंदगड तालुक्मयातील धनगर वाडय़ावर सुरू आहेत.