राजकारण, शिक्षण क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तीमत्व काळाच्या पडद्याआड : पेठ वडगाव येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार
प्रतिनिधी/कोल्हापूर
येथील शाहू शिक्षण संस्था, जयप्रकाश एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन, माजी आमदार अॅड. नानासाहेब शांताराम माने (वय 86 रा. अहिल्या निवास, जवाहर नगर) यांचे गुरूवारी सकाळी निधन झाले. प्रकृती अस्वस्थ्यामुळे माने यांच्यावर शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये गेली वीस दिवस उपचार सुरू होते. त्यांच्या पश्चात भाऊ, भावजय, बहिणी, पुतणे, पुतण्या असा परिवार आहे. माने यांच्या पार्थिवावर पेठ वडगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या प्रागंणात शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. रक्षाविसर्जन रविवारी (दि. 17) सकाळी 9:30 वाजता आहे.
अॅड. माने यांचा सामाजिक, शैक्षणिक, राजकीय चळवळीत सहभाग राहिला. 1 आŸगस्ट 1937 रोजी त्यांचा जन्म कोगनोळी (ता. चिकोडी) येथे झाला. नानासाहेब माने यांचे वडील शांताराम उर्फ तात्यासाहेब माने हे बŸरिस्टर होते. नानासाहेब माने यांनी वडिलांचा शैक्षणिक वारसा पुढे नेताना कायद्याच्या पदवीबरोबरच उच्च शिक्षण घेतले. उपजिल्हाधिकारी, प्रांताधिकारी म्हणून शासकीय सेवेत प्रवेशही केला. 1977-78 मध्ये त्यांनी प्रशासकीय सेवेचा राजीनामा देत थेट समाजकारण, राजकारणात उडी घेतली. जनता पक्षाच्या तिकिटावर ते पेठ वडगाव राखीव मतदार संघातून विधानसभेवर निवडून गेले. त्यावेळी शरद पवार यांनी पुलोद सरकारचा प्रयोग केला. पण ते सरकार अल्पकाळ टिकले. त्यामुळे माने यांना कमीकाळ आमदारकी भूषविता आली. पण त्यानंतरही त्यांनी समाजकारण आणि राजकारण सुरू ठेवले. राजर्षी शाहू महाराजांनी स्थापन केलेल्या शाहू शिक्षण संस्थेच्या मिस क्लार्क हॉस्टेलची जबाबदारी पार पाडताना त्यांनी समाजातील दलित, पददलित वर्गातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे कार्य केले. जयप्रकाश एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून त्यांनी पेठ वडगाव येथे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाची उभारणी केली.
माने यांनी जनता पक्षातून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांविषयीही त्यांना कळवळा होता. राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेतही त्यांनी काम केले. त्यांचा सर्व पक्षातील नेत्यांशी संपर्क होता. वयोपरत्वे त्यांनी शैक्षणिक कार्याला प्राधान्य दिले. आंबेडकरी चळवळीतही त्यांनी काम केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती उत्सव समितीचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. अॅड. माने यांच्या पत्नी सुजाता माने यांचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यानंतर ते खचले होते. निवृत्त प्राध्यापक सतीश माने यांचे ते बंधू तर जय प्रकाश एज्युकेशन सोसायटीच्या संचालिका प्रा. प्रमिला माने यांचे ते चुलते होत.
शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार
नानासाहेब माने यांच्या इच्छेनुसार पेठ वडगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या प्रागंणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याआधी येथील जवाहर नगरातील अहिल्या निवासस्थानी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते.
वडील बॅरिस्टर, मुलगा वकील, आमदार
अॅड. नानासाहेब माने यांचे मूळ गाव निपाणी जवळील कोडणी गाव. त्यांचे वडील शांताराम उर्फ तात्यासाहेब माने यांनी कठिण परिस्थितीतून शिक्षण घेत बŸरिस्टर होण्याचा बहुमान संपादन केला. त्या काळी मुंबई इलाख्यातील ते दलित समाजातील पहिले बŸरिस्टर ठरले होते. पहिले राष्ट्रपती डाŸ. राजेंद्र प्रसाद यांचे निकटवर्तीय असणाऱया बॅरिस्टर माने यांनी भारतीय राज्य घटनेच्या सुकाणू समितीचे सदस्य म्हणूनही जबाबदारी पार पाडली. अॅड. नानासाहेब माने यांनी वडिलांच्या वाटेवर जाताना वकील, उपजिल्हाधिकारी, प्रांताधिकारी आणि आमदारकी पर्यंत मजल मारली.
‘तरुण भारत’शी ऋणानुबंध
माजी आमदार अॅड. नानासाहेब माने यांचा ‘तरुण भारत’ परिवार आणि ‘तरुण भारत’चे समूह प्रमुख सल्लागार संपादक किरण ठाकुर यांच्याशी स्नेह होता. ‘तरुण भारत’च्या वर्धापन दिनाच्या सोहळय़ाला शुभेच्छा देण्यासाठी ते दरवर्षी आवर्जून उपस्थित राहत असत.