स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी राज्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्यासाठी मोठ्या प्रमाणात पैशाचा व्यवहार होत असल्याचा गंभीर आरोप करून यासंबंधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्राद्वारे विचारणा केली आहे. त्यांनी आपल्या पत्रात अधिकाऱ्यांच्या बदलल्यासाठी आणि सरकारी कामांसाठी घेतल्या जाणाऱ्या रक्कमांचा गोषवारा मांडून जर मी चुकीचं बोलत असेल तर माझ्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करा असे आव्हानही त्यांनी दिले आहे.
मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात कि, “राज्यात होणाऱ्या गुड गव्हर्नन्स आणि भ्रष्टाचारमुक्तीचा फक्ता बोलबाला काय कामाचा ? भ्रष्टाचाराची कुरण म्हणून ओळखली जाणाऱ्या शासनाची काही खात्यांमध्ये राजरोसपणे पैशांचे व्यवहार होत आहेत. महसूल, बांधकाम, नगरविकास, सामाजिक न्याय, सहकार, गृह, जलसंपदा या खात्यामध्ये कमालीचा अनागोंदीपणा माजला आहे. सामान्य माणसाला कामासाठी ताटकळत थांबावे लागत आहे. तसेत त्याच्या कामासाठी सरकारी अधिकाऱ्यांना लाच द्यावी लागत. आहे.” असे सांगताना सामान्य माणूस यामुळे मेटाकुटीला आल्याचे त्यांनी सांगितले आहे.
आपल्या पत्रात त्यांनी बदल्यांसाठी अधिकाऱ्यांकडून घेतल्या जाणाऱ्या रकमांचा लेखाजोखाच त्यांनी मांडला. राज्यात अधिकाऱ्यांच्या बदलीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना लाखापासून ते कोट्यवधीपर्यंत लाच द्यावी लागत आहे. हे आकडे थक्क करणारे असून बदलीसाठी दिलेला पैसा वसूल करण्यासाठी अधिकारी अजून भ्रष्टाचार करत आहेत” असा थेट आरोप त्यांनी केला.