वृत्तसंस्था /नवी दिल्ली
आयसीसीच्या पंच पॅनलमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट क्षेत्रात पंचगिरीची दर्जेदार कामगिरी करणारे पाकचे माजी क्रिकेट पंच आसद रौफ यांचे लाहोरमध्ये वयाच्या 66 व्या वषी हृदयविकाराने निधन झाले.
पाकचे पंच आसद रौफ यांनी 2000 साली पंचगिरी क्षेत्रात पहिल्यांदा आपले पदार्पण केले होते. आयसीसीच्या पंच पॅनलमधील ते अनुभवी आणि ज्ये÷ पंच म्हणून ओळखले जात. त्यांनी आपल्या पंचगिरीच्या कारकीर्दीमध्ये 64 कसोटी (49 सामन्यात मैदानावरील तर 15 सामन्यात टीव्ही पंच), 139 वन डे आणि 28 टी-20 सामन्यात पंचगिरी केली आहे. बुधवारी रात्री त्यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का आल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी लागलीच एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते. पण काही कालावधीतच त्यांची प्राणज्योत मालवली. गेल्या दोन दिवसांपासून त्यांना अस्वस्थ वाटत होते. आसद रौफ यांचा स्वतःचा खासगी व्यवसाय होता. या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांना पुरेशी विश्रांती मिळाली नाही. दरम्यान, हृदयविकाराचा झटका अत्यंत तीव्र असल्याने डॉक्टरांना इलाज करण्याची संधी मिळू शकली नाही, अशी माहिती त्यांच्या बंधूंनी लाहोर येथून दिली. गुरुवारी सायंकाळी लाहोरमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
आसद रौफ यांनी क्रिकेट क्षेत्रात उत्तम फलंदाज म्हणून पदार्पण केले होते. ते अव्वल दर्जाचे फलंदाज होते. त्यांची पाक संघामध्ये कसोटी मालिकेसाठी निवड झाली होती. पण त्यांना एकही कसोटी खेळण्याची संधी मिळाली नाही. क्रिकेट क्षेत्रातून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी पंचगिरी क्षेत्राकडे आपला मोर्चा वळविला. पंचगिरीच्या कारकीर्दीमध्ये त्यांनी महिलांच्या अकरा टी-20 सामन्यातही पंचगिरी केली. मैदानावरील त्यांचे निर्णय अचूक असल्याने खेळाडूंचा त्यांच्यावर कधीच आक्षेप नव्हता. रौफ हे नेहमीच हसतमुख रहात. रौफ यांच्या निधनाने पाक क्रिकेट क्षेत्राची मोठी हानी झाल्याची प्रतिक्रिया पीसीबीचे अध्यक्ष रमिज राजा यांनी आपल्या आदरांजलीमध्ये व्यक्त केली.
रौफ यांनी नॅशनल बँक आणि रेल्वे संघाकडून 71 प्रथमश्रेणी सामने खेळले आहेत. 2006 च्या एप्रिलमध्ये त्यांचा आयसीसीच्या पंच पॅनेलमध्ये समावेश करण्यात आला होता. आयसीसीच्या पंच पॅनलमध्ये आसद रौफ आणि अलिम दार हे पाकचे अनुभवी पंच म्हणून गणले गेले. 2016 च्या प्रारंभी आयपीएलमध्ये आसद रौफ यांच्यावर आर्थिक भ्रष्टाचार आणि बेशिस्त वर्तनाचा आरोप झाल्याने बीसीसीआयने त्यांच्यावर बंदी घातली होती. 2013 च्या आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंग प्रकरणात मुंबई पोलिसांच्या तपासणीत आसद रौफ यांच्यावर संशय व्यक्त करण्यात आला होता. मॅचफिक्सिंग करण्यामध्ये रौफ यांनी मोठय़ा प्रमाणात लाच आणि भेटवस्तू स्वीकारल्या असल्याचा आरोपही ठेवण्यात आला होता.
आयसीसीच्या शिस्तपालन नियमांचा भंग केल्याचा अहवाल आयसीसीकडे उपलब्ध झाल्यानंतर रौफ यांनी चॅम्पियन्स करंडक स्पर्धेतून स्वतःहून माघार घेतली. तसेच त्यांना आयसीसीच्या इलाईट पॅनेलमधून वगळण्यात आले आणि त्यांच्यावर पाच वर्षांची बंदी घातली गेली होती. भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाने रौफ यांच्यावर घातलेल्या बंदीनंतर रौफ यांची पंचांची कारकीर्द संपुष्टात आली. या घटनेनंतर पाक क्रिकेट मंडळानेही राष्ट्रीय स्पर्धेतील सामन्यांसाठी तसेच पाकमध्ये होणाऱया इतर स्पर्धांसाठी रौफ यांच्यावर निर्बंध घातले होते. पंचगिरी क्षेत्रातून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी लाहोरच्या लांडा बाजारमध्ये स्वतःच्या मालकीचे कापड आणि पादत्राणांचे दुकान थाटले होते.