सिनेसृष्टीत ‘वसंत’ नावाचे संगीतकार खरोखरच वसंत घेऊन येणारे ठरले. नवनिर्मिती, सृजनाचे सोहळे, सदाबहार गाणी आणि आजही, नव्या पिढीलाही तितकंच भावणारं, त्यांचं ताजं राहिलेलं संगीत आपल्याला वेगळय़ाच दुनियेत प्रवेश करवून देतं. गाण्याची साथ अर्थातच आपण गेल्या कित्येक लेखांतून बोलल्याप्रमाणे अंगाईपासून ते रुदालीपर्यंत अखंड सुरू असते. विशेषतः आपल्या भारतीय संस्कृतीत सणवार आणि संगीत यांची घट्ट वीण दिसून येते आणि महाराष्ट्रातला सर्वात दणकेबाज सण जर कोणता असेल तर तो म्हणजे गणेशचतुर्थीचा सण! ज्याची गाणी गोकुळाष्टमी यायच्या आधीच वाजायला सुरुवात होते, ज्याच्या आगमनासाठी वेगवेगळय़ा प्रकारच्या कृत्रिम फुलमाळा, लाईटच्या माळा, असंख्य प्रकारची आणि असंख्य प्रकारच्या कच्च्या मालापासून घडवलेली मखरं, देव्हारे, दिवे, धूप, कापूर, अगणित तऱहेच्या सुगंधी उदबत्त्या, अमाप ताजी सुगंधी फुलं, हार, पत्री, फळं, यांनी बाजारपेठा आणि गावातली घरं ओसंडून वाहत असतात; तो सगळय़ांचा लाडका बाप्पा नेमका आहे तरी कोण? तो आला तरी कुठून? त्याला अग्रपूजेचा मान का असतो? एकाही कार्याची सुरुवात गणेशपूजन केल्याशिवाय होत नाही. निर्गुण निराकार परमेश्वराची ही आराधना ‘जय जय गौरीशंकर’ सारख्या संगीत नाटकातून ‘निराकार ओंकार’ होऊन प्रकटली आहे. संगीतातला वसंत म्हणून गौरविल्या गेलेल्या वसंत देसाई यांनी या गीताला संगीत दिलं आहे.
निराकार ओंकार साकार झाला
स्वयें विश्वसंसार हा रंगविला
दिले रम्य चांचल्य सौदामिनीला
दिले दिव्य मांगल्य मंदाकिनीला
दिली चारुता प्रीत साऱया जगाला
शास्त्रीय संगीताचा मजबूत बाज असलेल्या या गाण्याचं सौंदर्य म्हणजे अगदी नेमके सटीक शब्द आणि त्या शब्दात व्यापून राहिलेला अर्थ! विद्याधर गोखले यांच्या लेखणीतून उतरलेलं हे गीत अर्थाच्या आणि शब्दयोजनेच्या दृष्टीने उत्कृष्ट असणं अगदी स्वाभाविक आहे. शिवाय जोडरागांचे बादशहा आणि अतिशय व्यासंगी बहुआयामी कलाकार म्हणून गाजलेले पं. रामभाऊ मराठे यांनी ते गायलंय. पंडितजींची गाणी ऐकत रहाणे हा काय दर्जाचा आनंद आहे हे ती ऐकणाऱया गानवेडय़ा रसिकांनाच कळू शकेल. पण ओंकाराचं मूळ निराकारत्त्व हे गाणं मांडण्याच्या पद्धतीतून अक्षरशः रेखून दाखवलंय त्यांनी. अकार, उकार आणि महेशाचा मकार या सगळय़ासहितच जणू. लयाकडे घेऊन जाणाऱया कडकडणाऱया सौदामिनीचं रम्य चांचल्य, जीवनदायिनी मंदाकिनीचं दिव्य मांगल्य आणि सृजनाचं मूळ असणारी शुद्ध स्वरुपातील सौंदर्यप्रीती यांचा त्रिवेणी संगम म्हणजेच गणनायक असणारा हा ओंकार.
अकार तो ब्रह्मा उकार तो विष्णु
मकार महेश जाणियेला
ऐसे तिन्ही देव जेथुनि उत्पन्न
तो हा गजानन मायबाप
हे शांत, सुंदर गीत ऐकताना आपल्याला ओंकारप्रधान असणारं गणेशाचं रूप डोळय़ांसमोर उभं राहतं. पूर्वीच्या स्त्रिया रांगोळी काढताना सहज चार रेषांतून संपूर्ण गणेशाकृती साकार करत असत. त्याचं असणं खरं तर इथे, तिथे, सर्वत्र असतं. ते ज्याला जितकं चटकन दिसतं तितकं मोजक्मया शब्दांतून, स्वरांतून, रेषांतून अचूक मांडता येतं. भल्या पहाटे रियाज करताना ॐ या ओंकाराच्या एकशब्दी उच्चारणातून नाही का तो गणपती, नादाधिपती प्रकटत? आणि हा अभंग लिहिणारे तुकाराम महाराज आपल्याला पक्का संदर्भही देतात. तो म्हणजे-
तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी
पहावी पुराणी व्यासांचिया
म्हणजे मी म्हणतो म्हणून माना असं नाही तर आद्यगुरू व्यास महषी यांनीच ते म्हणून ठेवलेलं आहे. ज्यांचं गाणं आपल्या जिवाला आतून गारवा देतं त्या सुमन कल्याणपूर यांनी हे गायलंय आणि गेले कित्येक वर्षे ते गणपतीउत्सवाचं युएसपी म्हणून राहिलंय. तो ओंकार अनादि अनंत असतो. ज्याचा आदि अंत कुणाच्याही कल्पनेपलीकडे आहे अशाचा पसारा किती आणि कुठेपर्यंत असेल? सुधीर मोघे लिखित
ओंकार अनादि अनंत अथांग अपरंपार
नादब्रह्म परमेश्वर सगुण रूप साकार
आठवा. तो स्वर म्हणजेच ओंकार आणि तो ओंकार म्हणजेच साऱया संगीतसृष्टीचं इवलं बीज! आपल्याला त्याचा थांग थोडाच लागणार? पण दयाळू, भक्तवत्सल प्रभू आपल्या भक्तांना लीला दाखवण्यासाठी अवतार धारण करतात. कधी मूषकवाहन म्हणून तर कधी मयुरेश्वर म्हणून. कश्यपमीर म्हणजेच आताच्या काश्मीरमध्ये कश्यपमुनी व देवमाता अदिती यांचा पुत्र म्हणून अवतार घेतलेल्या महोत्कट गणेशाचं मंदिर आजही आहे. तेच बाप्पा पार्थिव गणपती म्हणून मूषकावर बसून येतात. त्यांच्या प्रत्येक वाहनामागेही मोठा अर्थ दडलेला आहे. मूषक म्हणजेच काळाचं प्रतीक आहे. उंदीर जसा सतत वस्तू कुरतडत असतो त्याचप्रमाणे काळ आयुष्य कुरतडून खात असतो. याच काळावर नियंत्रण ठेवणारे हे पार्वतीपुत्र गणेश! अपप्रवृत्तीरूपी नागाला बंधित करणारे, त्याच नागाला उंदरासोबतच राहूनही त्याच्याशी शिस्तीत वागायला लावणारे, संगीतप्रियता दर्शविणारे घुंगुरवाळे पायात वागविणारे आणि अखंड गोडव्याचा प्रसाद म्हणून मोदक हाती धरणारे हे गणाधीश आपल्या घरातलेच होऊन जातात. आपल्या नादभाषेचे हेच उद्गाता आहेत. कलाकारांचे विधाता आहेत, प्रत्यक्षात विराट होऊन चराचरात नांदणारं चैतन्य ओंजळभर मातीतून साकार होऊन येणारेही हेच आहेत. आणि मातीतून गणपती घडवण्याचं कारणही हेच आहे की मातीची ताकद आपल्याला उमजून यावी. अक्षरशः ज्या मूठभर मातीतून अंकुराचं जीवन उपजतं आणि जग तरतं त्या मातीची महत्ता आपल्याला समजावून देण्यासाठीच ते मातीतून घडतात. आपल्या आयुष्याच्या नश्वरतेची मनुष्याला जाणीव व्हावी म्हणून तर हे रूप नसेल?
गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमही
गुणशरीराय गुणमंडिताय गुणेशानाय धीमही
गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमही
एकदंताय वक्रतुंडाय गौरीतनयाय धीमही
कानावर पडलं की आपल्याला ताबडतोब शंकर महादेवन आठवतात. (त्यांनी ते गाणं अर्थातच इतकं सुंदर गायलंय की गणराय खरंच त्यांना आशीर्वाद देऊन गेलेच असतील याची खात्री ऐकणाऱयाला वाटतेच वाटते.) पण या गाण्यातून गणेशतत्त्व म्हणजे काय, याचा सुरेल अहवालच मांडलाय. आणि त्यातलं प्रथम रुप म्हणजे गणांचा अधिपती. याचाच अर्थ असा की मोठय़ा संख्येने असणाऱया समुदायाचं नेतृत्त्व यशस्वीपणे करणारा. त्यासाठी अनेक गुण आणि चातुर्य अंगात असणारा, कल्पकता, अतिसूक्ष्म ग्रहणशक्तीचा स्वामी, नीरक्षीरविवेकी आणि विघ्ननाशक प्रथमेश. शिव आणि शक्तीचे गुण घेऊन आलेला गुणेश. गंमत मात्र पुढेच आहे. इतकं विराट रूप आपल्या घरी आणताना आपल्या मनामनात आणि घराघरात मात्र ‘वाजे मृदुंग टाळ वीणा, ये रे नाचत गौरीगणा’ ‘हृदयाच्या तालावर नाचे गणेशु निनादती पैंजणे’, ही सुप्रसिद्ध गणेशगीतं आणि अगदी ‘माझं गणराज आलं’, ‘सनईचा सूर कसा’, ‘ग गणपतीचा’ अशी लोकगीतंच वाजत असतात. कारण भले तो जगाचा स्वामी असेल, पण आपल्यासाठी वर्षातून काही दिवस आपल्या घरी पाहुणा म्हणून येणारा लाडका बाप्पा असतो. आणि अगदी प्रापंचिक चिंता तक्रारीही त्याच्या पायाशी बसून सांगाव्यात,
आली कशी पहा आज वेळ,
कसा बसावा खर्चाचा मेळ
गूळ फुटाणं खोबरं नि केळं,
साऱया प्रसादाची केली भेळ
कर भक्षण आणि रक्षण,
तूच पिता तूच माता
अशी ‘जमवून घे बाबा’वाली विनंती करावी इतका जवळचा असतो. या सगळय़ा गीतांतून जनसामान्यांचा बाप्पा उभा करणाऱया पं. वसंतराव देशपांडे ते प्रल्हाद शिंदे ते सलील कुलकर्णी आणि अगदी उकडीचा मोदक फेम प्रथमेश लघाटे या सर्व गायक कलाकारांना मात्र वंदन! कारण या भावना आपल्या सर्वांच्या आहेत, पण जतन करून ठेवणे आणि संगीतातून कळवणे, हे काम तर तेच करतात. निराकार असणारा ओंकार असा साकार होत असतो.
– ऍड. अपर्णा परांजपे-प्रभू