प्रतिनिधी /मडगाव
पंचामृत इंडस्ट्रिज या अन्न उत्पादनाच्या क्षेत्रातील सुप्रसिद्ध नावाने दक्षिण भारतातील पहिला ‘फोर्टिफाईड राइस ब्रँड’ आणला असून ‘पंचामृत फोर्टिफाईड तांदूळ’ हा अनोखा व अभूतपूर्व आहे. कारण तांदळातील पौष्टिक सामग्री सुधारण्यासाठी त्यात जीवनसत्त्वे आणि खनिजे आहेत, असे संचालक जंबुलिंगप्पा होसमणी यांनी मडगाव येथे पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले.
गोव्यात 2002 मध्ये पंचामृत उतरविण्यात आला. आमचा मंत्र होता ‘घर घर मे पंचामृत’. तेव्हापासून आम्ही खूप पुढे गेलो आहेत. पंचामृतचे वैशिष्टय़ म्हणजे गुणवत्तेत, किमतीत आणि पुरवठय़ात सातत्य आहे. 2015 मध्ये केंद्र सरकारने देशातील कुपोषणाचा सामना करण्यासाठी फोर्टिफाइड उत्पादने तयार करण्याची गरज जाहीर केली. आम्ही ते आव्हान म्हणून स्वीकारले. आमचा तांदूळ मजबूत केला आणि संपूर्ण गोवा राज्यात आमचे जाळे मजबूत केले, असे होसमणी यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला कंपनीचे साक्षात होसमणी, प्रवीण मुतालिक, अनिरुद्ध उपकारी हे हजर होते.
फोर्टिफाइड उत्पादने तयार करणारे आम्ही दक्षिण भारतातील पहिले ब्रँड आहोत. या नवीन फोर्टिफाइड तांदळाचे फायदे असे आहेत की, ते हिमोग्लोबिनचे प्रमाण सुधारते, ऍनिमियाशी लढा देते, मजबूत रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करते आणि चयापचय मजबूत करते, असा दावा याप्रसंगी करण्यात आला. जेव्हा लोक पंचामृत तांदूळ खरेदी करतात तेव्हा त्यांना पॅकमध्ये काही पिवळे दाणे दिसतात. त्या पिवळ्या दाण्यांमुळेच तांदूळ मजबूत होतो. आम्ही या पिवळ्या धान्याच्या विविध चाचण्या करून त्याचे फायदे अभ्यासले आहेत, असे यावेळी सांगण्यात आले. बळकट पंचामृत तांदळात लोकांचे शारीरिक आरोग्य आणि तंदुरुस्ती सुधारण्याची क्षमता आहे, असे होसमणी यांनी सांगितले.