मृत्युमुखी पडलेल्या जनावरांची संख्या आता पोहोचली 26 वर
वार्ताहर /सांबरा
तालुक्याच्या पूर्व भागांमध्ये लम्पिस्कीन आजाराने एका दिवसामध्ये एका गाईसह चार जनावरांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात पुन्हा चिंतेचे वातावरण पसरले आहे. पूर्वभागामध्ये लम्पिस्कीन आजाराने मृत्युमुखी पडलेल्या जनावरांची संख्या आता 26 वर पोहोचली आहे.
शुक्रवारी बसवण कुडची येथील शेतकरी सचिन खोकलेकर यांच्या बैलाचा मृत्यू झाला आहे. पंधरा दिवसांपूर्वी यांच्याच एका बैलाचा मृत्यू झाला होता. बसरीकट्टी येथील शेतकरी निंगाप्पा कोंडसकोप व चंद्रकांत सांबरेकर त्यांच्या बैलांचाही लम्पिस्कीमुळे मृत्यू झाला आहे. मुतगा येथील शेतकरी वसंत पाटील यांच्या गाईचाही मृत्यू झाला आहे .
दिवसेंदिवस लम्पिस्कीनचा फैलाव वाढत चालला असून, शेतकऱयांना आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत आहे. लम्पिस्कीनने तर शेतकऱयांचे कंबरडेच मोडले आहे. परंतु अशा परिस्थितीत शेतकऱयांना आर्थिक पाठबळ देण्याऐवजी शासनाने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे.