सभागृहात गदारोळ केल्याने संपूर्ण अधिवेशनासाठी कारवाई
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
लोकसभा सभागृहात गदारोळ केल्याने काँग्रेसच्या चार खासदारांना संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आले आहे. या 4 खासदारांमध्ये मणिकम टागोर, टी. एन. प्रतापन, ज्योतिमणी आणि रम्या हरिदास यांचा समावेश आहे. सभागृहाचा अवमान केल्याप्रकरणी या सदस्यांना पावसाळी अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी सभागृहाच्या कामकाजातून निलंबित करण्यात आले आहे. त्यानंतर लोकसभेत विरोधकांनी प्रचंड गदारोळ केल्याने सभागृहाचे कामकाज मंगळवार, 26 जुलै रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. लोकसभेप्रमाणेच राज्यसभेतही विरोधकांनी गदारोळ केल्याने कामकाज काही काळासाठी तहकूब करण्यात आले होते.
महागाईसह इतर मुद्यांवर विरोधी सदस्यांनी प्रचंड गदारोळ केल्याने लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांनी चार खासदारांवर निलंबनाची कारवाई केली आहे. सोमवारी पावसाळी अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी अध्यक्षांनी सभागृहात आंदोलक खासदारांना अंतिम इशारा दिला. हे लोकशाहीचे मंदिर असल्याने इथे गदारोळ चालणार नसल्याची ताकीद दिली. तरीही विरोधकांनी घोषणाबाजी सुरू ठेवल्याने चौघांना निलंबित करण्यात आले. पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी संसदेच्या आवारात फलक घेऊन जाण्यास आणि निदर्शने करण्यास बंदी घालण्यात आली होती.
काँग्रेस खासदारांवर करण्यात आलेली ही कारवाई नियम 374 अन्वये करण्यात आली आहे. यामध्ये नियमांमध्ये जिद्द आणि सभागृहाचे कामकाज जाणूनबुजून थांबवणे यांचा समावेश होतो. याशिवाय अध्यक्षांच्या अधिकाराचा अवमान करणे आणि नियमांचा गैरवापर करणे यांचाही या नियमात समावेश आहे. या खासदारांविरोधात प्रथम निलंबनाचा प्रस्ताव देण्यात आला होता, त्यानंतर सर्वांचे एकमताने निलंबन करण्यात आले आहे.
सरकार घाबरवतेय ः काँग्रेस
चार खासदारांच्या निलंबनावर काँग्रेसने सरकार त्यांना धमकावण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगत पक्ष डगमगणार नसल्याचे म्हटले आहे. आमच्या खासदारांना निलंबित करून सरकार आम्हाला धमकावण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांची चूक काय होती? ते लोकांचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करत होते, असे लोकसभेतील काँग्रेसचे उपनेते गौरव गोगोई यांनी म्हटले आहे.
सरकारची चर्चेची तयारी, तरीही…
गेल्या आठवडय़ात संसदेच्या पावसाळी अधिवेशनात महागाई आणि जीएसटीवर विरोधकांच्या प्रचंड विरोधामुळे फारसे कामकाज होऊ शकले नाही. सोमवारपासून सुरू झालेल्या कामकाजात विरोधक एकत्र आलेले दिसत आहेत. दुसरीकडे, सरकारने सभागृहात चर्चा करण्याचे मान्य केले आहे. मात्र, तातडीने चर्चा होत नसल्याने विरोधक सभागृहात गोंधळ घालण्याचा प्रयत्न करत आहेत.