महामार्गावरील पोलादपूर हद्दीतील चोळईनजीकचा अपघात; मृतांमध्ये रिक्षाचालकासह तीन डीएड विद्यार्थिनींचा समावेश; शर्थीच्या पयत्नानंतर मृतदेह काढले बाहेर, डम्पर चालक ताब्यात
खेड प्रतिनिधी
मुंबई-गोवा महामार्गावरील पोलादपूर हद्दीतील चोळईनजीक डम्परमधील राखेचा ढिगारा रिक्षावर कोसळून चौघांचा जागीच अंत झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी 7.30 च्या सुमारास घडली. मृतांमध्ये रिक्षाचालकासह डीएडच्या 3 विद्यार्थिनींचा समावेश आहे. अपघातानंतर डम्पर चालकाने घटनास्थळावरून पोबारा करण्याचा पयत्न केला. मात्र ग्रामस्थांनी त्याला शिताफीने ताब्यात घेतले. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रिक्षातील चारही मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना पत्येकी 5 लाख रूपयांची मदत जाहीर केली आहे.
रिक्षाचालक अमाज उमर बहूर (40, गोरेगाव) यांच्यासह हानिमा अब्दुल सलाम पोपेरे (23, नांदवी-माणगाव), अलिया सिद्दीक बहूर (20, गोरेगाव), नाझनीन मुकिद करबेलकर (22, वावे-पोलादपूर) यांचा मृतांमध्ये समावेश आहे. रिक्षाचालक बहूर रिक्षातून (एम.एच. 06 बी.व्ही. 2313) तीन विद्यार्थिनींना घेवून परीक्षेसाठी खेड येथे आले होते. परीक्षेनंतर त्याच रिक्षाने त्या परतीच्या पवासाला निघाल्या होत्या.
डम्परचालक मधुकर तुळशीराम वाघमारे (50, वडगाव-भोर) हा आपल्या ताब्यातील डम्परमधून (एम.एच. 12 एम.व्ही. 3733) राख घेवून खेडहून भोरच्या दिशेने जात होता. चोळईनजीकच्या वळण उतारावर डम्पर उलटून आतील राखेचा ढिगारा रिक्षावर कोसळला. या राखेच्या ढिगाऱयाखाली रिक्षातील चौघे गाडले गेले. अपघातानंतर साऱया यंत्रणांची धावाधाव सुरू झाली.
अपघाताचे वृत्त कळताच पोलादपूर पोलीस, महामार्ग मृत्यूंजय दुतांसह रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहचून बचावकार्य हाती घेतले. रिक्षावर कोसळलेला राखेचा ढिगारा हटवण्यासाठी जेसीबीची मदत घेण्यात आली. रात्री उशिरा चौघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. डंपर चालकाने मद्यपाशन केल्याचे पुढे आले आहे.
मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत जाहीर
रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, महाड उपविभागीय पोलीस अधीक्षक नीलेश तांबे, महाडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अवसरमल, पोलादपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज म्हसकर यांनी घटनास्थळी भेट देत बचावकार्यासह तपासकार्यास मार्गदर्शन केले. महाडचे आमदार भरत गोगावले यांनी ग्रामीण रूग्णालयात मृतांच्या नातेवाईकांची भेट घेत सांत्वन केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने मृतांच्या वारसांना 5 लाख रूपयांची मदत जाहीर केल्याचे ट्विट उद्योगमंत्री व रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.