पुणे / प्रतिनिधी :
Four farmers died due to lightning in Pune गावच्या बंधाऱ्यात मोटार बसवण्यासाठी गेलेल्या चार जणांचा विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू झाल्याने भोर तालुक्यात खळबळ उडाली. हे चौघेजण शेतकरी कुटुंबातील होते. या चार मृतांमध्ये बाप लेकांचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच राजगड पोलिस घटनास्थळी दाखल झाले.
विठ्ठल सुदाम मालुसरे, सनी विठ्ठल मालुसरे, अमोल चंद्रकांत मालुसरे, आनंदा ज्ञानोबा जाधव (सर्व रा. निगडे ता. भोर जि. पुणे) अशी मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत.
नीरा नदी पात्रातील पाण्यात मोटार ढकलत असताना अचानक वीज प्रवाह गायब झाला. त्यावेळी चौघेजण मोटार बसवण्यासाठी पाण्यात उतरले होते. मात्र वीज प्रवाह अचानक सुरू झाल्याने विद्युत प्रवाह पाण्यात उतरला. त्यामुळे या चौघांचा जागेवरच मृत्यू झाला. महावितरणामुळेच ही घटना घडली असल्याचे परिसरातील नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. घटना घडण्यापूर्वी वीजप्रवाह अधूनमधून खंडित होत होता. विद्युत प्रवाह पाण्यात उतरला आणि या चौघांना आपले प्राण गमवावे लागले. नेमकी ही घटना कधी घडली याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. या घटनेमुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून निगडे गावावर शोककळा पसरली आहे. अधिक तपास राजगड पोलीस करत आहेत.
अधिक वाचा : महाराष्ट्रात थंडी वाढणार