ऑनलाईन टीम/तरुण भारत
नाशिकमधील (Nashik) येवला MIDC परिसरात स्वतःला मुस्लीम अध्यात्मिक बाबा म्हणून घेणाऱ्या एका अफगाणी नागरिकाची हत्या मंगळवारी करण्यात आली होती. ही हत्या पैशांच्या कारणावरून त्याच्या सहकाऱ्यांनीच केल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. मृत्यूमुखी पडलेल्या अध्यात्मिक बाबाचं नाव सुफी ख्वाजा सय्यद झरीफ चिश्ती (Khwaja Syed Zarif Chishti) असं होतं. चिश्ती हे मूळचे अफगाणिस्तान (Afghanistan) इथले असल्याची माहितीही पोलिसांनी दिली होती. दरम्यान झरीफ बाबाची हत्या संपत्तीसाठीच झाली होती हे आता निश्चित झालं आहे. त्यांच्या हत्येप्रकरणी चार मुख्य मारेकर्यांना अटक करण्यात ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. तशी कबुलीही त्या चार मारेकऱ्यांनी दिली आहे.
दरम्यान, येवला तालुक्यातील अफगाणी धर्मगुरू झरीफ बाबा उर्फ ख्वाजा सैय्यद झरीफ चिश्ती (वय २८, रा. मूळ अफगाणिस्तान, ह. मु. मिरगाव, आदित्य हॉटेलमागे, वावी, ता. सिन्नर, जि. नाशिक) यांच्या चार मुख्य मारेकर्यांना अटक करण्यात ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. अद्याप दोन संशयित फरार असून, त्यांच्या मागावर पथके आहेत. परंतु, ताब्यात घेतलेल्या चारही आरोपींकडून संपत्तीसाठीच खून केला गेल्याची कबुली देण्यात आली आहे. मुख्य म्हणजे, झरीफ चिश्ती यांनी पत्नी काही दिवसांपूर्वीच वावीत आली होती, तेव्हापासून बाबांच्या हत्येचा कट रचला गेला आणि कोपरगावच्या एका सराईताला या हत्येची सुपारी दिली गेली. त्यानुसार बाबाची डोक्यात गोळी झाडून हत्या केली गेल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.
येवला शहर पोलीस ठाणे हद्दीत ५ जुलै रोजी चिंचोडी खु. एमआयडीसी शिवारात अफगाणी धर्मगुरू सुफी ख्वाजा सैय्यद झरीफ चिश्ती यांना काही मारेकर्यांनी ठार मारून त्यांची एक्सयूव्ही कार (क्र. एमएच ४३ बीयू ७८८६) घेऊन फरार झाले होते. याप्रकरणी येवला शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन फॉरेन्सिक टीम तसेच श्वान पथकास पाचारण करून तपासाच्या सूचना केल्या. त्यानुसार काही पथके जिल्हाबाहेर विविध ठिकाणी मारेकर्यांच्या शोधार्थ पाठवण्यात आली होती. बाबाची कार दुसर्याच दिवशी संगमनेर शहरात कारखाना रोड परिसरात मिळून आली होती. त्याप्रमाणे पोलीस अधीक्षक पाटील यांनी तपास पथकास अहमदनगर, पुणे व मंबई जिल्ह्यात रवाना केले. तेव्हा संगमनेर शहरात मिळालेल्या माहितीवरून ठाणे, मुंबई परिसरात आरोपी वास्तव्यास असल्याचे समजले. त्यनुसार पोलिसांच्या पथकाने खबर्यांमार्फत माहिती घेवून गफार अहमद खान याच्यासह गणेश उर्फ देवा बाबासाहेब झिंजाड उर्फ पाटील (वय २८, रा. शिंदेमळा, लोणी, ता. राहाता, जि. अहमदनगर), रवींद्र चांगदेव तोरे (चालक- वय २५, रा. शहाजापूर, कोळपेवाडी, ता. कोपरगाव, जि. अहमदनगर), पवन पोपट आहेर (वय २६, रा. विठ्ठलनगर, येवला) यांना रात्रभर पाळत ठेवून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले.
चार वर्षांत तीन कोटींची संपत्ती
जरीफ बाबाने भारतात आल्यानंतर आजवर चार वर्षांत तीन कोटींची संपत्ती कमावली. अफगाण निर्वासीत असल्याने बाबाला भारतात संपत्ती घेणे वा कुठलाही आर्थिक व्यवहार करणे शक्य नव्हते. परिणामी, बाबाने चालक आणि जवळच्या काही चेल्यांच्या नावावर संपत्ती घेतली. यूट्युब, फेसबूक, इन्टाग्राम अशा सोशल मीडिया माध्यमांद्वारे लाखो फॉलोअर्सच्या माध्यमातून बाबाच्या पुंजीत महिन्याकाठी कित्येक लाखांनी भर पडत होती. धार्मिक मार्गदर्शन आणि सिनेस्टार्सची जवळीक दाखवून बाबा फॉलोअर्स वाढवत होता. शिवाय धार्मिक कार्यक्रमांच्या नावे देणग्याही जमवत होता. मात्र, हीच संपत्ती बाबाच्या मृत्यूचे कारण ठरली. मुळात बाबाच्या जीवाला यापूर्वीच धोका असल्याचे वारंवार बोलले जात होते. अखेर त्यांच्या चालक आणि चेल्यांनीच बाबाची हत्या केल्याचे उघड झाले.