ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे आज दुपारी दुर्धर आजाराने निधन झाले. पुण्याच्या राजकारणात सर्वसमावेशक’ राजकारणासाठी ते ओळखले जात होते. विरोधी पक्षाची सत्ता असली तरी आपले काम कसे करून घ्यायचे याचे कसब त्यांच्याकडे कसब होते. हेच त्यांच्या चाळीस वर्षांच्या यशस्वी राजकीय कारकीर्दीचे रहस्य राहिले. बापट यांच्या निधनामुळे एक मनमिळावू व्यक्तीमत्त्व काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना जनमानसातून व्यक्त होत आहे.
टेल्कोचे कामगार ते खासदार असा राहिला जीवनप्रवास
3 सप्टेंबर 1950 रोजी तळेगाव दाभाडे येथे गिरीश बापट यांचा जन्म झाला. प्राथमिक शिक्षण तळेगाव दाभाडे येथे, माध्यमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल येथे तर बीएमसीसी महाविद्यालयात त्यांनी बी.कॉम पूर्ण केले. त्यानंतर 1973 साली ते टेल्कोमध्ये कामगार म्हणून रूजू झाले. मूळचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे असल्याने त्यांनी टेल्कोत नोकरी करताना कामगार संघटनेच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला. संघ स्वयंसेवक, कामगार नेता, नगरसेवक, आमदार, खासदार तसेच राज्याच्या मंत्रिमंडळात अनेक खात्यांचे मंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अशा विविध पदावर काम केले.
1983 ला पुणे महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले. सलग तीनवेळा नगरसेवक राहिले. 1995 पासून कसबा पेठ मतदारसंघात सलग पाचवेळा आमदार होते. राज्याच्या मंत्रिमंडळात अनेक खात्यांचे मंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री म्हणून काम केले. 2019 ला पुण्याचे खासदार म्हणून विक्रमी मताधिक्याने ते निवडून आले. मात्र, त्यानंतर दुर्धर आजाराने त्यांना ग्रासले. मात्र, आजारपणातही ते राजकारणात सक्रिय राहिलेले कसबा निवडणुकीत दिसून आले.
बापट यांनी काही दिवसांपूर्वी कसबा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप कार्यकर्त्यांचा एक मेळावा घेतला होता. या मेळाव्याला बापट व्हिलचेअरवरून ऑक्सिजन सपोर्टवर आले होते. त्यानंतर मतदानाच्या दिवशीही त्यांनी ऑक्सिजन सपोर्टवर येऊन मतदानाचा अधिकार बजावला होता. त्यानंतर गुढीपाडव्यानिमित्त कसबा गणपतीसमोर बापट यांच्या खासदार निधीतून करण्यात आलेल्या विकास कामांच्या उद्घाटनाला काँग्रेसचे विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर आणि त्यांचे भाजपमधील प्रतिद्वंद्वी हेमंत रासने यांना आमंत्रित करण्यात आले होते. असा सर्वसमावेशकपणा बापट यांच्या राजकीय कारकीर्दीत कायम दिसून आला.