हरियानातील अंबाला शहरातील विक्रम नामक एका व्यक्तीची ही यशोगाथा आहे. पोट चालविण्यासाठी त्याला बालपणापासून हॉटेलमध्ये वेटरचे काम करावे लागले. पण त्याच्यातील जन्मजात तंत्रज्ञ त्याला स्वस्थ बसू देईना. वेटरचे काम करता करता तुटपुंज्या वेतनातूनही काही पैसे साठवून त्याने भंगारातील एक बाईक विकत घेतली. स्वतःची बुद्धी, कल्पनाशक्ती आणि निर्धाराच्या बळावर या बंद पडलेल्या बाईकचे इलेक्ट्रिक बाईकमध्ये रूपांतर केले. आज त्याने तयार केलेली ही बाईक अवघ्या दहा रुपये खर्चात 80 किलोमीटरचे अंतर कापू शकते.
21 वषीय विक्रम अंबाला येथील छावणी क्षेत्रात आजही हॉटेलमध्ये वेटरचे काम करतो. तथापि, त्याच्यातील उपजत तंत्रज्ञानाची बुद्धी भल्या भल्या इंजिनियर्सनाही तोंडात बोट घालावयास लावते. इंजिनियरिंगचे कोणतेही औपचारिक शिक्षण नसताना त्याने केवळ निरीक्षण आणि वाचन यांच्या जोरावर हे तांत्रिक कौशल्य आत्मसात करून घेतले आहे. बंद पडलेल्या बाईकचे रूपांतर विजेवर चालणाऱया बाईकमध्ये करण्यासाठी त्याला प्रारंभ खर्च दहा हजार रुपये आल्याचे तो सांगतो. त्यानंतर या बाईकमध्ये सुधारणा करून तिला आधुनिक स्वरुप प्राप्त करून देण्यामध्ये आणखी साधारणतः 45 हजार रुपये खर्च झाले आहेत. कोणतीही अत्याधुनिक उपकरणे आणि साधनसामग्री नसताना केवळ भंगार मालातील उपयुक्त वस्तूंचा उपयोग करून त्याने बाईकचे रूपांतर केले आहे. अनेकांचा यावर विश्वास बसत नाही. तथापि, ही बाईक प्रत्यक्ष चालताना पाहून लोक आश्चर्य व्यक्त करतात. विक्रमचे वडील श्यामलाल हे मजुरी करत होते. तर आई गृहिणी होती. अत्यंत मर्यादित उत्पन्न असणाऱया या कुटुंबाला आपल्या मुलांना उच्चशिक्षित करणे अशक्यच होते. तरीही नैसर्गिक बुद्धिमत्तेचा उपयोग करून विक्रमने मारलेली ही मजल अनेकांसाठी आदर्शवत ठरणारीच आहे, असे बुजुर्गांचे मत आहे. या इलेक्ट्रिक बाईकची मोटरही त्याने भंगारातून विकत घेतली असून नंतर या मोटरमध्ये आवश्यक त्या सुधारणा केल्या आहेत. ही बाईक थ्री स्पीड मोड बटणवर चालते. आता एक स्टार्टअप कंपनी सुरू करून अशा बाईक्सचे उत्पादन करण्याची त्याची महत्त्वाकांक्षा आहे. ही बाईक बडय़ा कंपन्यांच्या अशा बाईक्सपेक्षाही अधिक सक्षम आणि स्वस्त असेल, असा विश्वास तो व्यक्त करतो.