सुरळीत वाहतुक, पार्किंग व पादचाऱयांसमोर अडचणी, करवाईकडे पालिकेचे दुर्लक्ष
प्रतिनिधी /वास्को
वास्को शहरात फळ विक्रेत्यांची अतिक्रमणे रस्त्यावर उतरली आहेत. या अतिक्रमणांमध्ये दिवसेदिवस वाढ होत आहे. फळ विक्रेत्यांच्या या अतिक्रमणांमुळे वाहने पार्किंगची समस्या, पादचाऱयांची समस्या आणि सुरळीत वाहतुकही समस्यांमध्ये अडकली आहे. फळविक्रीमुळे वास्को शहरात सध्या गोंधळाचे वातावरण आहे. आश्चर्य म्हणजे या प्रकाराविरूध्द कोणतीच कारवाई होत नाही.
वास्को शहरात फळ विक्रेत्यांनी रस्त्यांवरच अतिक्रमण केलेले असले तरी या विक्रेत्यांना पालिकेकडून अभय मिळत असल्याचे दिसत आहे. मुरगाव पालिका अधूनमधून भाजी मार्केटमधील अतिक्रमणांविरूध्द कारवाई करीत असते. त्यामुळे काही दिवस अतिक्रमणे दूर झालेली दिसतात व पादचाऱयांना ये जा करणे शक्य होते. परंतु काही दिवसांनंतर या मार्केटमध्ये भाजी विक्रेत्यांचा लवाजमा पुन्हा रस्त्यावरच उतरतो. या समस्येविरूध्द नागरिकांमध्ये नाराजी आहे. मात्र, पालिकेकडे या समस्येवर सध्या उपाय नसल्याचे दिसून येते. गेले काही महिने या मार्केटमध्ये अनागोंधी माजलेली आहे. कायदा व नियमांना इथे थाराच नाही. शहरातील फळ विक्रेत्यांनी तर कहरच केलेला आहे. त्यानाही विचारणारा कोणीच नसल्याचे दिसून येते. शहरातील बऱयाच रस्त्यावर फळ विक्रेत्यांनी ठाण मांडलेले आहे. हे विक्रेते पादचाऱयांना अडचणीचे ठरतात. वाहने पार्किंगसमोरही समस्या निर्माण करतात. सुरळीत वाहतुकीतही अडथळा आणतात. उभ्या आडव्या रस्त्यांवर आणि मिळेल त्या कोपऱयातसुध्दा विक्रेत्यांचा उपद्रव सुरू आहे. मात्र, त्यांच्यावर कधी कारवाई होत नाही. मागच्या दोन वर्षात कोरोनाच्या व लॉकडाऊनच्या निमित्ताने फळभाजीचा बाजार बराच वाढलेला आहे. सर्वत्र रस्ते व्यापून हे फळविक्रेते बसलेले असतात. कोरोना आणि लॉकडाऊन संपला तरी त्या काळातील बाजाराचा विस्तार संपलेला नाही.
एफ.एल. गोम्स रस्त्यावरील फळविक्री अत्यंत धोकादायक
शहरातील भाजी मार्केटसमोर असलेल्या एफ.एल. गोम्स रस्त्यावर तर या फळ विक्रेत्यांनी सरळ सरळ अतिक्रमण केलेले आहे. या मुख्य रस्त्यावर या फळांच्या बाजारामुळेच मालवाहू ट्रकखाली चिरडून काही दुचाकी चालक व पादचाऱयांचा मृत्यू झालेला आहे. या बाजारामुळे हा मार्ग धोकादायक म्हणून ओळखला जातो. साधारण पंधरा वर्षांपूर्वी या रस्त्याच्या बाजुला दुकाने थाटायला बंदीच होती. मात्र, आश्चर्यकारकरीत्या पालिकेने त्यांना या रस्त्यावर दुकाने थाटण्यास हिरवा कंदील दाखवला. रस्त्यावर आलेल्या फळ विक्रेत्यांसमोर चार वाहनेही उभी असतात. मधल्या जागेत ग्राहक उभे असतात. त्यामुळे पादचाऱयांना कुठून चालावे हेच समजत नाही. या रस्त्यावरील फळविक्रेत्यांचे अतिक्रमण हा अत्यंत संतापजनक प्रकार आहे. मात्र, मुरगाव पालिका, नगरसेवक, समाजसेवक, पोलीस, वाहतुक पोलीस अशा कोणालाही ही अतिक्रमणे हटवावी असे का वाटत नाही हे एक कोडेच आहे.