यावर्षीच्या आंबा पिकाचा हंगाम आता संपत आला आहे. कोकणामध्ये यावर्षीच्या हंगामात आंबा पिकाच्या उत्पादनात फार मोठी वाढ झाली. मात्र अवकाळी पाऊस, प्रचंड उष्णतेमुळे नुकसानही झाले. त्यातूनही टिकून राहिलेल्या पिकावर फळमाशीच्या प्रादुर्भावामुळे भावही पडले. त्यामुळे आंबा पिक उत्पादनात वाढ होऊनही आंबा बागायतदार शेतकऱयांना नुकसान सोसावे लागले.
कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हय़ात यावर्षी आंबा पिकाचे उत्पादन फार मोठय़ा प्रमाणात वाढले होते. त्यामुळे आंबा पिकातून चांगले उत्पन्न यावर्षी मिळेल आणि गेली चार-पाच वर्षे सतत नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागून होणारे नुकसान यावर्षी भरून निघेल, या आशेवर आंबा बागायतदार होते. परंतु यावर्षीही नैसर्गिक आपत्तीला तोंड द्यावे लागल्याने त्यांची निराशा झाली. त्यात फळमाशांचा प्रादुर्भाव वाढल्याने आंबा पिकावर त्याचा परिणाम होऊन आंब्याचे दरही घसरले.
आंबा पिकाच्या माध्यमातून कोकणात दरवर्षी 30 ते 40 हजार कोटीची उलाढाल होत असते. आर्थिक उत्पन्न मिळवून देणारे हे एक प्रमुख पिक आहे. कोकणातील हापूस आंब्याची ओळख सर्वदूर पसरलेली आहे. परंतु, या पिकाला आता सातत्याने वेगवेगळय़ा संकटांना तोंड द्यावे लागत आहे. वातावरणातील बदलामुळे फळपिकांवर परिणाम झाला आहे. सतत ढगाळ वातावरण, अवकाळी पाऊस, वाढते तापमान, पूर्व मोसमी पाऊस यामुळे आंबा पिकाचे नुकसान झाले
आहे.
यावर्षीचा आंबा पिकाचा हंगाम जवळ-जवळ संपत आला आहे. आणखी पंधरा दिवस आंबा मिळेल, त्यानंतर पाऊस सुरू होताच हंगामही संपणार आहे. या संपूर्ण हंगामाचा विचार केल्यास समाधानकारक हंगाम गेलेला नाही. सलग पाच वर्षे नैसर्गिक आपत्तीला तोंड द्यावे लागले आहे. मार्च, एप्रिल आणि मे हे महिने आंब्याचा पूर्ण हंगाम असतो. परंतु, यावर्षी उशिराच एप्रिलमध्ये आंबा तयार झाला. आंबा हंगाम पुढे-पुढे सरकत न जाता आंबे एकाचवेळी मोठय़ा प्रमाणात पिकून बाजारात येऊ लागले. सुरुवातीला चांगला दर मिळाला. परंतु, नंतर आंब्याचा दर घसरतच गेला.
आंबा हंगाम सुरू होताच सुरुवातीला अवकाळी आणि वादळी वाऱयासह पडलेल्या पावसामुळे नुकसान झाले. त्यानंतर उष्णता वाढल्याने झाडावरच आंबे पिकून गळ झाली. त्यानंतर फळमाशींचा प्रादुर्भाव वाढला आणि आंब्याचा दर पडला. अडीचशे रुपये डझन एवढय़ापर्यंत दर घसरला. बदलत्या वातावरणाचा खऱया अर्थाने आंबा पिकाला फटका बसत असल्याने बदलत्या वातावरणातही आंबा टिकू शकतो, यावर संशोधन होणे गरजेचे आहे. बदलत्या वातावरणामुळे कीड रोगाचा प्रादुर्भाव होत असतो. फूल कीडे, तुडतुडे, बुरशी, फळमाशी यासारख्या कीड रोगांचा प्रादुर्भाव गेल्या तीन-चार वर्षांत वाढला आहे. त्यामुळे बागांचे व्यवस्थापन करणे कठीण झाले आहे. कधी पाऊस, कधी ढगाळ वातावरण यामुळे नेमके काय करावे हेच बागायतदारांना समजेनासे झाले आहे. परिणामी उत्पादनावर त्याचा परिणाम होऊन 30 ते 35 टक्केच उत्पादन शेतकऱयांना मिळत असून उर्वरित 65 ते 60 टक्के उत्पादन सततच्या वातावरणातील बदलामुळे वाया जात आहे.
फळमाशीने यावषी आंबा उत्पादक शेतकऱयांना सळो की पळो करून सोडलं. याचा परिणाम म्हणजे आंब्याचा भाव पडला. त्यामुळे उरला सुरला आंबा कॅनिंगला घालावा लागला. ही फळमाशी झाडावर आंबा कच्चा असताना त्यावर बसून नांगीने आंब्याच्या वरच्या हिरव्या आवरणात बारीकसे छिद्र पाडून त्यात असंख्य अंडी सोडते. हे छिद्र वरून नुसतं पाहिलं, तर दिसत नाही. आंबा उतरवला आणि तो पिकायला ठेवला की जसा-जसा आंबा पिकत जातो, तसतसा त्यावर एक बारीकसा काळा डाग दिसू लागतो. आंबा पिकत चालला की हा डाग मोठा होत जातो आणि त्यातून मग अळी बाहेर पडते व आंबा फेकून द्यावा लागतो. मागच्या आठवडय़ातील कोकणातील अनेक बागायतदारांच्या व्यथा जाणून घेतल्या असता आंबा उत्पादक अगदी हवालदिल दिसून आला.
आंब्याचा खरा हंगाम सुरू होतो मार्चनंतर आणि नेमकं त्याचवेळी वादळी पाऊस पडला आणि बरेचसे आंबे गळून पडले. या गळून पडलेल्या कैऱयांवर या फळमाशांनी अंडी घालून मोठय़ा प्रमाणात पैदास केली. त्यामुळे नुकसान प्रचंड झाले.
या माशांवर कोणताही जालीम उपाय नाही. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एक ट्रप लावला जातो. ज्यात मुख्यतः नर अडकला जातो आणि मरतो. जास्तीत जास्त नर मारला गेला की, आपोआप फळमाशांच्या प्रजनन क्षमतेवर प्रतिबंध यावा, हा त्यामागचा उद्देश. काही प्रमाणात तो यशस्वी होतोय. पण त्यासाठी हा प्रयोग सगळय़ाच बागायतदारांनी करायला हवा. एका शेतात केला आणि बाजूच्या बागायतीत हे ट्रप लावले नाही, तर काहीही उपयोग होत नाही. कारण बाजूच्या शेतातील नर-मादी एकत्र येऊन त्यातली फळमाशी ट्रप लावलेल्या शेतात येतेच आणि ती या ट्रपमध्ये अडकत नाही. या एका कारणाने यावेळी आंब्याच्या उत्पादनावर खूप मोठा परिणाम झाला आणि त्यावर बागायतदार काहीही करू शकला नाही, ही वस्तुस्थिती आहे.
आंबा हंगामामध्ये काम केवळ तीन चार महिनेच असेही नाही. वर्षभर प्रत्येक कलमाची, झाडाची व्यवस्थित देखभाल व निगा राखल्यावरंच आपल्याला आंबा बघायला मिळतो. जून महिन्यापासूनच त्यावर काम करायला सुरुवात होते. हंगाम संपला की पालापाचोला गोळा करायचा, बाग साफसूफ करायची, कलमाभोवती अळे करून हा पालापाचोळा त्यात टाकायचा आणि कंपोष्ट खत तयार करायचं. एवढच नव्हे तर वेळोवेळी लेंडी खत आणि अनेक प्रकारची खतं टाकायची. मग वेगवेगळय़ा फवारण्या. ऑक्टोबरपासूनच त्या सुरू होतात. त्यांचा खर्चही खूप असतो. साधारण एका लिटरला पाच ते सहा हजार खर्च येतो.
एक कीडा असा आहे की जो मोहोर लागताच, त्या मोहोराच्या मुळाशी छोटंसं छिद्र करून आत घुसतो आणि तो सगळा मोहोर आतून पोकळ करून टाकतो. मोहोरच संपवला की मग आंबा कसा येणार? त्यावरही मग काम करावं लागतं. आंबा आला की मग तो काढायचा खर्चही खूप आहे. हंगाम असल्याने ‘लेबर कॉस्ट’ अचानक खूप वाढते. कोकणातला आंबा हा बहुतांश कातळावर आणि डोंगर उतारावर असल्याने आंबा उतरवणे हे कमालीचे कष्टाचे काम असते.
आंब्याला भाव मिळतो, तो फक्त सुरुवातीच्या काही दोन-तीन आठवडय़ांत. अक्षयतृतीया झाली की भाव पडतात आणि मग उत्पादन खर्चाइतकेही पैसे मिळणे मुश्किल होऊन जाते. पडलेल्या भावामुळे आंबा उतरवणेही परवडत नाही. अशा अनंत अडचणींतून मार्ग काढत हा फळांचा राजा आपल्या घरात पोहोचतो. परंतु या फळांच्या राजावर यावषीच्या हंगामात फळमाशांनी डल्ला मारल्याने आंबा बागायतदारांना फार मोठे नुकसान सोसावे लागले आहे.
संदीप गावडे