पुणे : अपात्रतेचे कारण पुढे करीत फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) संस्थेने ओबीसी, एससी आणि एसटी प्रवर्गातील अनेक जागा भरलेल्याच नाहीत. संस्थेने शैक्षणिक वर्ष 2021 ची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली आहे. त्यातून ही बाब समोर आली आहे. ज्या आरक्षणाच्या आधारे हे प्रवेश होणार आहेत. त्या आरक्षणाच्या तरतुदींचीच क्रूर चेष्टा करण्यात आल्याचा आरोप एफटीआयआय स्टूडंट असोसिएशनने केला आहे.
असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, एफटीआयआय प्रशासनासमोर यासंदर्भात प्रश्न उपस्थित केले असता अनेक उमेदवारांनी कट ऑफ टक्केवारी ओबीसी (45 टक्के), एससी आणि एसटी (40 टक्के), जनरल (50 टक्के) उत्तीर्ण केलेली नाही. मात्र, हे आकडे कसे आणि कोणाकडून आले याबददल कोणतीही पारदर्शकता नाही. या निकषांची वैधताच मुळी विवादास्पद आहे. या मनमानी नियमाचा परिणाम असाही होऊ शकतो की, या श्रेणींमध्ये योग्य उमेदवार मिळत नाहीत म्हणून राखीव जागा सामान्य श्रेणीतील विद्यार्थ्यांच्या भरल्या जातील असे ही प्रशासन म्हणू शकते. ओबीसी, एससी आणि एसटी प्रवर्गातील नसताना केवळ विशेषाधिकारप्राप्त, सामान्य जागांसाठी इच्छुक असलेले उच्च जातीतील उमेदवारच कट ऑफ उत्तीर्ण होऊ शकतात, हे देखील अत्यंत शंकास्पद आहे. या प्रक्रियेद्वारे, सर्वसाधारण प्रवर्गातील सर्वांसाठी खुल्या ठेवल्या जाणाऱ्या जागा इतर प्रवर्गातील लोकांसाठीही बंद ठेवल्या जातील.
संस्थेत प्रवेश घेणारे विद्यार्थी मुलभूत सामाजिक हक्कांवर होणाऱ्या हल्ल्यांविरूद्ध आवाज उठवता कामा नयेत, म्हणून त्यांचा आवाज दडपण्याचा हा प्रयत्न आहे. संस्थेच्या स्वनिर्मित नियमांच्या आड लपून आरक्षणाच्या
कायद्याचे उघडपणे उल्लंघन केले जात आहे, असे सांगत राखीव श्रेणींसाठी पात्रता निकष धोरण रद्द करावे तसेच निकालाचे पुनर्मूल्यांकन करावे या मागणीसाठी एफटीआयआय स्टुडंट असोसिएशनने आंदोलन केले.
हेही वाचा : पुणे विद्यापीठातील तिघांना ‘मधमाशी पालन’ उपकरणासाठी पेटंट