राहुल गांधींनी दिग्विजय सिंहांच्या वक्तव्यापासून अंग झटकले ः सर्जिकल स्ट्राइकवर व्यक्त केला होता संशय
\वृत्तसंस्था / जम्मू
काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी सोमवारी सर्जिकल स्ट्राइकवरून पुरावे मागितल्याने मोठा वाद उभा ठाकला आहे. काँग्रेस किंवा माझे दिग्विजय सिंह यांच्या वक्तव्याशी कुठलेच देणेघेणे नाही. दिग्विजय यांचा हा वैयक्तिक दृष्टीकोन असू शकतो, आमचा नाही, काँग्रेस आणि माझा आणि सैन्यावर पूर्ण विश्वास आहे. भारतीय सैन्याला कुठल्याही कामगिरीकरता पुरावे देण्याची गरज नसल्याचे उद्गार राहुल गांधी यांनी काढले आहेत.
राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा जम्मू-काश्मीरमध्ये पोहोचली आहे. यादरम्यान दिग्विजय सिंह यांनी सर्जिकल स्ट्राइकचे पुरावे कुठे आहेत अशी विचारणा करत पुलवामा हल्ल्याबद्दलही प्रश्न उपस्थित केले होते. दिग्विजय यांच्या या वक्तव्यामुळे काँग्रेसची चांगलीच गोची झाली आहे.
सैन्यावर आम्हाला पूर्ण विश्वास आहे. सैन्याला कुठल्याही कामगिरीकरता पुरावे दाखविण्याची गरज नाही. दिग्विजय सिंह यांच्या वक्तव्याला काँग्रेस पक्षाचे तसेच माझे समर्थन नाही. दिग्विजय सिंह यांच्या वक्तव्याशी मी सहमत नसल्याचे राहुल म्हणाले.
भाजप लोकांना धर्म आणि जातीच्या आधारावर विभागू पाहत आहे. देशात द्वेष फैलावला जात आहे. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने इंग्रजांना साथ दिल्याचा आरोप करत राहुल गांधींनी काँग्रेसने या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिल्याचा दावा केला. काँग्रेसच्या फिलॉसॉफीवर (तत्वज्ञान) भारत निर्माण झाला आहे. इंग्रजांशी काँग्रेस लढत असताना संघ आणि भाजप त्यांच्यासोबत उभे होते. सावरकर यांनीच द्विराष्ट्राची संकल्पना मांडली होती असा दावा राहुल यांनी केला आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये मी लोकांना भेटत आहे, सर्वांच्या मनात संवेदना आहेत, तरुण-तरुणींना कुठलेच भवितव्य दिसून येत नाही, येथे उद्योग नाहीत, शेतकऱयांना मदत मिळत नाही, लोकांचे म्हणणे ऐकून घेत त्यानुसार कृती लागू करणे हे आमच्या भारत जेडो यात्रेचे लक्ष्य असल्याचे राहुल यांनी म्हटले आहे.
काश्मीरच्या लोकांच्या मनात असलेले दुःख आम्ही जाणून घेण्यासाठी आलो आहोत. आम्ही सर्वांवर प्रेम करतो, त्यांचा आदर करतो. जम्मू-काश्मीर अवघड काळातून वाटचाल करत असल्याचे जाणतो. जम्मू-काश्मीरदररम्यान भाजपने तयार केलेली दरी संपविण्याचे काम करण्यासाठी आम्ही आलो आहोत. द्वेषाने काहीच साध्य होत नाही, हिंसेने कुठलाच प्रश्न सोडविता येत नाही असे राहुल यांनी म्हटले आहे.
आझादांची माफी मागतो..
गुलाम नबी आझाद यांना भारत जोडो यात्रेत निमंत्रित न करण्यात आल्याबद्दल राहुल यांना प्रश्न विचारण्यात आला. गुलाम नबी आझाद यांच्या पक्षाचे बहुतांश सदस्य आमच्यासोबत होते. त्या पक्षात केवळ आझाद राहिले आहेत. आझाद यांचा मी आदर करतो, त्यांना कुठल्याही प्रकारे दुःख पोहोचविले असल्यास त्यांची माफी मागतो असे राहुल म्हणाले. गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेला सोडचिठ्ठी देत स्वतःचा पक्ष स्थापन केला आहे.
दिग्विजय यांचे वादग्रस्त वक्तव्य
पुलवामा हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान हुतात्मा झाले होते. सर्व जवानांना एअरलिफ्ट करण्याची विनंती सीआरपीएफच्या अधिकाऱयांनी पंतप्रधान मोदींना केली होती, परंतु मोदींनी ती मान्य केली नाही. पुलवामा हल्ल्याप्रकरणी आजपर्यंत संसदेसमोर कुठलाच अहवाल मांडला गेलेला नाही. सर्जिकल स्ट्राइक केल्याचा दावा सरकारकडून करण्यात आला, परंतु पुरावा दाखविण्यात आला नाही, भाजप केवळ खोटं बोलत असल्याचे विधान दिग्विजय सिंह यांनी केले होते.