प्रतिनिधी / बेळगाव :
मंगळवारी रात्री हृदयाघाताने निधन झालेले मंत्री उमेश कत्ती यांच्यावर बुधवारी सायंकाळी बेल्लद बागेवाडी (ता. हुक्केरी) या त्यांच्या मुळ गावी सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. यासाठी सर्व तयारी करण्यात आली आहे.
राज्यसरकारने एक दिवस दुखवटा जाहिर केला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयांसह सरकारी कार्यालयांवर राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकाfवण्यात आले आहेत. बेळगाव शहर आणि जिल्हय़ातील शाळा-कॉलेज आणि सरकारी कार्यालयांना सुट्टी जाहिर करण्यात आली आहे.
बेल्लद बागेवाडी येथील विश्वराज साखर कारखान्याच्या आवारात पार्थिवाच्या अंत्यदर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. सायंकाळी उमेश कत्ती यांच्या आई-वडीलांच्या समाधीजवळ त्यांच्यावर लिंगायत धर्म पद्धतीनुसार अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. विशेष विमानाने त्यांचे पार्थिव बेळगावला आणण्यात येणार आहे. चेन्नई येथे खराब हवामान असल्यामुळे एअर अँब्युलन्स बेंगळूरला पोहाचण्यास विलंब झाला आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्माई, माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा, विरोधी पक्षनेते सिद्धराम³या यांच्यासह अनेक नेते अंत्यसंस्कारात भाग घेण्यासाठी बेळगावला येत आहेत.