माजी चेअरमन ऍड. श्रीपतराव शिंदे यांचे आवाहन
प्रतिनिधी/गडहिंग्लज
गडहिंग्लज साखर कारखाना हंगाम सुरू असताना व्यक्तीव्देषाने बंद पाडण्यासाठी एकत्र आलेल्या विरोधकांनी शेतकरी, कामगार आणि तालुक्यातील सहकार टिकविण्यासाठी हिंमत असेल तर एकत्र यावे. डॉ. शहापूरकर यांनी मेळाव्यात कारखान्याची एक हाती सत्ता द्यावी कारखाना चालवतो जाहीर केले आहे. त्यांची तयारी असेल त्यांनी ‘गोडसाखर’ चालवण्यास घेत करून दाखवावे असे आवाहन माजी चेअरमन ऍड. श्रीपतराव शिंदे यांनी पत्रकार बैठकीत केले.
गडहिंग्लज येथील जनता दलाच्या कार्यालयात रविवारी दुपारी आयोजीत बैठकीत ते बोलत होते. यावेळी बोलताना ऍड. शिंदे पुढे म्हणाले, कंपनीने कारखाना कराराप्रमाणे चालविला नाही. सेवानिवृत्त कामगारांची देणी आणि इतर काही गोष्टीमुळे दोन वर्ष आधीच कारखाना सोडला. त्यानंतर आम्ही शेतकरी, सभासद आणि कामगारांच्या हितासाठी कारखाना स्वबळावर सुरू केला. पण व्यक्तीव्देषातून भाजपा, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि डॉ. शहापूरकर गटाने कोणते प्रयत्न केले. हे सारेजण जाणून आहेत. कारखाना कुणामुळे बंद पडला ? हे समजले आहे. ज्यांनी तालुक्यातील एकही सहकारी संस्था टिकविली नाही. त्यांनीच कारखान्याच्या जमिनीचा लिलाव लावण्यास भाग पाडला असा आरोपाचा टोला देखील लगावला.
यावेळी विरोधकावर जोरदार आरोप केले. कंपनी आणि कारखाना करारानुसार साखर लवादाकडे अधिकार असताना कंपनीने न्यायालयात धाव घेत कारखाना आणि निवृत्त कामगारांची देणी अडकवल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. 28 डिसेंबर रोजी माजी संचालक अमर चव्हाण यांच्या सहकार्याने कारखाना सुरू केला आणि सुरू असलेला कारखाना बंद कसा पडेल या विचारानेच 12 माजी संचालकांनी राजीनामा दिल्याची टिका या बैठकीत केली. काही माजी संचालक आणि विरोधकांनी एकत्र येत कारखाना बंद पाडला असून आता त्यांना जाब विचारण्याची वेळ आल्याचे मत व्यक्त करत यासाठी शेतकरी, सभासद आणि सेवानिवृत्त कामगार सज्ज असल्याचे शेवटी त्यांनी सांगितले. बैठकीस माजी संचालक बाळासाहेब मोरे, बाळकृष्ण परीट, भिमराव पाटील, शशिकांत चोथे, उदय कदम, रमेश मगदूम, रमेश पाटील यांच्यासह अन्य उपस्थित होते.