मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांचे प्रतिपादन : खानापूर येथे भाजपतर्फे जनसंकल्प यात्रा कार्यक्रम
वार्ताहर /खानापूर
सर्वसामान्यांसाठी विविध योजना राबवून भाजपने जनतेचा विश्वास संपादन केला आहे. राज्यात पुन्हा भाजप सरकार सत्तेवर येणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी खानापूर येथील जनसंकल्प यात्रेच्या कार्यक्रमात व्यक्त केला.
व्यासपीठावर लक्ष्मण सवदी, राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी, मंत्री गोविंद कारजोळ, आमदार अनिल बेनके, भाजपचे बेळगाव जिल्हा अध्यक्ष संजय पाटील, भाजपचे रवी कुमार, ऍड. नेर्ली, मराठा निगमचे अध्यक्ष एम. जी. मुळे, आमदार भैरती बसवराज आदींसह खानापूर तालुक्मयातील भाजपचे नेते व पदाधिकारी उपस्थित होते.
भारत ही पुण्यभूमी आहे. समाज, संस्कृती, संस्कार, अबाधित ठेवण्यासाठी अनेक राजे महाराजांनी आणि स्वतंत्र सैनिकांनी आपला त्याग केला आहे. अशा त्यागाचे बलिदान वाया जाऊ न देता कर्नाटकातूनच भारत देश बांधण्याचा आमचा संकल्प आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सबका साथ सबका विकास या तत्त्वावर आम्ही देशाचा विकास करणार आहोत. त्यामुळे भाजपचा देश बांधणीचा संकल्प आहे. राज्याचे यापूर्वीचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी संध्यासुरक्षा, भाग्यलक्ष्मी, विद्यार्थ्यांना सायकल, शेतकऱयांना वीज आदी लोकोपयोगी योजना सुरू केल्या. तसेच माझ्या नेतृत्वाखाली सरकारने शेतकऱयांची मुले उच्चशिक्षित व्हावीत म्हणून विद्यानिधी योजना सुरू केली. शेतकरी, कामगार, मच्छीमार, गवळी यांना त्यांच्या विकासासाठी विविध योजना आखण्यात आल्या
आहेत.
सर्व समुहातील लोकांना विविध योजना आखून त्यांचा विकास साधण्याचा प्रयत्न सर्वत्र सुरू आहे. महिला व युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून स्व-साहाय्य संघ, युवक संघाच्या माध्यमातून 5 लाखाचा निधी प्रत्येक संघाला देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. देशात आणि राज्यात काँग्रेसने जनतेचे शोषण केले आहे. कोणत्याच योजना काँग्रेसने जनतेसाठी राबविलेल्या नाहीत, जनतेचे भाग्य उजळण्याऐवजे त्यांनी दुर्भाग्य केले आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाला जनतेने झिडकारले असून राज्यात विरोधी पक्ष म्हणून बसविले आहे. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या राज्यात अधिकारावर येणार या गर्तेत आहेत. पण जनता त्यांना व विशेषतः काँग्रेसच्या नेत्यांना घरात बसविल्याशिवाय राहणार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. माजी मंत्री सतीश जारकीहोळी यांनी हिंदूंबाबत वक्तव्य केले आहे त्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली.
खानापुरात मोठमोठे प्रकल्प उभारण्याचा संकल्प
खानापूरच्या विकासाबाबत बोलताना ते म्हणाले, तालुक्यातील दूध व्यवसाय वृद्धिंगत व्हावा, यासाठी तालुक्यातील गवळी, धनगर तसेच पशू पालकांसाठी 5 कोटीचे विशेष अनुदान तात्काळ मंजूर करणार आहे. तसेच जांबोटी भागातील मध उच्च प्रतीचा आहे. या ठिकाणी मध संकलन केंद्र स्थापन करण्यासाठी 5 कोटी रुपये मंजूर केले
आहेत.
देगाव मल्टिव्हिलेज योजनेद्वारे तीनशे गावांच्या पाण्याचा प्रश्न निकालात निघणार आहे. खानापूर तालुक्याचा औद्योगिक विकास झालेला नाही याची खंत आहे. यासाठी तालुक्यात मोठय़ा प्रमाणात उद्योग व्यवसाय निर्माण करण्यासाठी केआयडीबीला सूचना करण्यात येणार आहेत. त्यांच्या माध्यमातून मोठमोठे प्रकल्प उभारण्याचा संकल्प आहे. त्यामुळे तालुक्यातील युवकांच्या हाताला रोजगार मिळेल. तालुक्यातील इतर मागासवर्गीय तसेच अनुसूचित जाती व जमातीसाठी प्रत्येकी एकेक हॉस्टेलही मंजूर करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी मंत्री गोविंद कारजोळ, मंत्री लक्ष्मण सवदी, राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी आदींनी आपले विचार मांडले.
तालुका भाजपच्या वतीने या जनसंकल्प यात्रेच्या कार्यक्रमासाठी मोठय़ा प्रमाणात खानापूर तालुक्यात प्रचार करण्यात आला होता.
येत्या निवडणुकीत एकजुटीने राहण्याचे आवाहन
मुख्यमंत्र्यांनाही खानापूर भाजपमधील गटबाजीची कल्पना आहे. यावेळी ते बोलताना म्हणाले, मागील निवडणुकीत आमच्याच पक्षाच्या लोकांनी वेगळी भूमिका घेतल्याने या ठिकाणी काँग्रेसची जागा आली. यासाठी येणाऱया विधानसभा निवडणुकीत सर्वांनी एकजुटीने राहून भाजपला विजयी करावे, असे आवाहन केले. व्यासपीठावरील उपस्थित इच्छुक उमेदवारांना उभे करून पक्षाबाबत कोणतीही गद्दारी करणार नसल्याची स्वतः शपथ देवविली. यावेळी इच्छुक नऊ उमेदवारांनी शपथ घेतली. या शपथमुळे उपस्थित नागरिकांमध्ये गटबाजीची व गद्दारीची चर्चा सुरू होती.
काँग्रेसकडून भारत तोडोचे काम : रायबाग संकल्प यात्रेत मुख्यमंत्र्यांचा घणाघात
काँग्रेसला सध्या वाईट काळ सुरू आहे. आमदार सतीश जारकीहोळी यांनी हिंदू धर्माबद्दल अपशब्द वापरले आहेत. याचे फार दुःख वाटते. राहुल गांधी एकीकडे भारत जोडो यात्रा करीत आहेत. पण त्यांचे कार्यकर्ते भारत तोडोचे काम करीत आहेत. काँग्रेस पक्ष देशद्रोह करीत असल्याचा घणाघात मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी केला. रायबाग येथे भाजपच्यावतीने संकल्प यात्रेस प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. मुख्यमंत्री बोम्माई म्हणाले, येत्या निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपचा विजय निश्चित आहे. रायबाग मतदारसंघातून दुर्योधन ऐहोळे हे पुन्हा आमदार होणार यात शंका नाही. आमदार ऐहोळे यांनी मतदारसंघात सरकारच्या अनेक योजना यशस्वीपणे राबविल्याचे त्यांनी सांगितले.
मंत्री शशिकला जोल्ले म्हणाल्या, या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या महिला पाहता येणाऱया निवडणुकीत भाजपचा विजय निश्चित आहे. भाजपमध्ये महिला वर्गास मोठा सन्मान असल्याचे त्यांनी संगितले. पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनीही मनोगत व्यक्त करून मुख्यमंत्र्यांच्या कारकीर्दीत उत्तर कर्नाटकाच्या विकासासाठी अनेक योजना मंजूर झाल्याचे सांगितले. आमदार पी. राजीव, लक्ष्मण सवदी, माजी खासदार रमेश कत्ती यांनीही मनोगत व्यक्त केले.