दोन वर्षांच्या कोरोना निर्बंधानंतर उद्या घरोघरी होणार प्रतिष्ठापना
प्रतिनिधी/ रत्नागिरी
गणपती बाप्पाच्या आगमनाची आतुरता सर्वांनाच लागून राहिलेय…गेली दोन वर्ष तर कोरोनाच्या सावटात, निर्बंधाच्या कचाटय़ात गणेशोत्सव साजरा झाला…पण कोरोचा संसर्ग कायमचा दूर झालेला नसला तरी त्याचे भान राखून गणेशोत्सवात दंग होण्यासाठी साऱया भाविकांची घरोघरी मोठी लगबग सुरू आहे. जिल्ह्य़ात मोठय़ा प्रमाणात चाकरमानीही दाखल होत आहेत. बुधवारी गणेशचतुर्थीच्या दिवशी जिल्ह्य़ात 114 सार्वजनिक तर 1 लाख 66 हजार 140 खासगी गणपतींची प्रतिष्ठापना केली जाणार आहे.
सर्वांचे लाडके आराध्य दैवत विघ्नहर्ता गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी जवळजवळ पूर्णत्वाला गेलेली आहे. पण गेली दोन वर्ष तर संपूर्ण देशात व विविध प्रांतात कोरोनाने आपले रौद्र रूप धारण केलेले होते. कुठलाही गाजावाजा न करता, कुठलीही मिरवणूक न काढता अगदी साध्या पद्धतीने बाप्पाचे आगमन करण्यावर प्रत्येक भक्तगण व सार्वजनिक मंडळाने भर दिला होता. मूर्तिशाळांच्या दरवाजातच मूर्ती आणण्यासाठी येणाऱया भाविकांची गर्दी रोखण्यात आलेली होती. पण यावर्षी कोरोनाचे संकट ओसरले…सारे निर्बंधही हटले.
सोमवारपासूनच जिल्हय़ात गणेशभक्तांनी मूर्तीशाळेतून मूर्ती नेण्यास प्रारंभ केला. आजही या मूर्ती घरी नेण्यात भक्तगण दंग राहणार आहेत. बुधवारी तर गणरायाचे भक्तीपूर्ण वातावरणात आगमन होणार आहे.