महागाईने हैराण, मात्र भक्तांमध्ये उत्साह
प्रतिनिधी /पणजी
राज्यातील सर्वात मोठा उत्सव गणल्या जाणाऱया गणेशचतुर्थी उत्सवाला आजपासून प्रारंभ होत असून त्याच्या पूर्वसंध्येला गणपती चित्रशाळेतून श्री गणेशमूर्ती खरेदीसाठी भक्तमंडळींनी एकच गर्दी केल्याचे दिसून आले. राज्यातील गणेशोत्सवासाठी सारी तयारी पूर्ण झाली असून आता थोडय़ाच वेळात घरोन्घरी श्री गणपतीच्या पूजेला प्रारंभ होईल.
राज्यात आजपासून सुरु होणाऱया गणेशचतुर्थीची सारी तयारी पूर्ण झाली आहे. राज्यातील भाविक मंडळी गणपती बाप्पाच्या स्वागतास सज्ज झालेला आहे. किमान अडीच लाख गणेशमूर्तींची स्थापना आज पहाटेपासून होत आहे. गोव्यात घरच्या गणपती उत्सवाला फार महत्त्व असून घरोन्घरी बाप्पाच्या स्वागतासाठी बरीच लगबग उडालेली आहे. बाजारातून माटोळीचे सामान तसेच गणपतीसमोर करावयाची आरास सजविण्यासाठीचे सामान खरेदीसाठी एकच गर्दी उसळली होती. माटोळीच्या सामानाचे दर गगनाला भिडले होते. सुपारी (बेडे)च्या एका घडाची किंमत रु. 800 पर्यंत जाऊन पोहोचली तर माडावरुन उतरलेल्या प्रत्येक नारळाची किंमत रु. 200 ते 250 पर्यंत जाऊन पोहोचली होती. केळीच्या घडाची किंमतही 500 रु.च्या वर होती. याशिवाय रानातली फुले व फळे तसेच शंकर पार्वतीच्या पुजेला लागणारी पिवळ्य़ा फुलांची हरणे बाजारात विक्रीस होती त्यांचे दरही वाढलेले होते. गोव्यात सर्वत्र भक्तमंडळींमध्ये उत्साह संचारलेला आहे.
यंदा चतुर्थीसाठी लावण्यात येणाऱया फटाक्यांच्या एका बॉक्सची किंमत 850 ते रु. 1000 पर्यंत पोहोचली आहे. फटाक्यांचा आकार लहान झाला असला तरी दर मात्र वाढलेले आहे. याशिवाय दारुसामानाच्या आतषबाजीसाठी इतर प्रकारही बाजारात आलेले आहेत व त्यांचेही दर वाढलेले आहेत. यावर्षी चिकणमातीच्या मूर्तींचे दर 2500 ते 3500 या दरम्यान पोहोचलेले आहेत. महागाईने शिखर गाठले असले तरी गोमंतकीय जनतेचा उत्साहात कोणताही फरक पडलेला नाही.
गोव्यात घरोन्घरी दीड व पाच दिवसांच्या गणपती उत्सव प्रामुख्याने केला जातो. याशिवाय सात दिवस व क्वचित नऊ आणि 11 दिवस गणपती उत्सव साजरा केला जात असतो. राज्यात सर्वच गावांमध्ये राज्य सरकारने गणेश विसर्जन स्थळे विद्युतरोषणाईने व नव्याने काही घाट बांधून तसेच साफसफाई करुन सज्ज ठेवलेले आहेत.
मुख्यमंत्र्यांकडून शुभेच्छा !
आजपासून सुरु होणाऱया या गणेशोत्सवानिमित्त मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यातील जनतेला हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. गणपती ही बुद्धीची देवता आहे शिवाय संकटांवर मात करणारी, विघ्ने दूर करणारी देवता आहे. राज्यातील मुले हुषार होऊ दे. सुसंस्कृत पिढी त्यातून निर्माण होऊ दे तसेच राज्यावर येणारी सर्व संकटे दूर होऊ दे अशी मुख्यमंत्र्यांनी श्री गणपती चरणी प्रार्थना केली आहे.