वृत्तसंस्था / रायबरेली
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कोलकाता महिला डॉक्ट बलात्कार आणि हत्या प्रकरणीवर विचारलेला प्रश्न टाळल्याने भारतीय जनता पक्षाने त्यांच्यावर टीकेची झोड उठविली आहे. गांधी मंगळवारी आपला लोकसभा मतदारसंघ रायबरेलीच्या दौऱ्यावर होते. रायबरेलीत एका दलिताची काही दिवसांपूर्वी हत्या करण्यात आली होती. गांधी यांनी या तरुणाच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले.
नंतर त्यांनी पत्रकार परिषदेत या तरुणाच्या हत्येसंबंधी संताप व्यक्त केला. उत्तर प्रदेशात दलितांची जीव सुरक्षित नसल्याची टीका केली. त्यावेळी त्यांना पत्रकारांनी कोलकाता येथील प्रकरणासंबंधी प्रश्न विचारला. मात्र, राहुल गांधी या प्रश्नाला उत्तर देणे टाळले. यावर मी पूर्वी बोललो आहे. आता पुन्हा बोलणार नाही. कारण मला दलिताच्या हत्येच्या प्रकरणापासून लक्ष्य हाटवायचे नाही, असे उत्तर त्यांनी दिले. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने त्यांच्यावर शरसंधान केले आहे. पश्चिम बंगालमधील घटनेवर मौन पाळून गांधी यांनी आपली असंवेदनशील वृत्ती दाखवून दिली आहे. त्यांचे दलित प्रेमही बेगडी आहे. काँग्रेसची सत्ता असणाऱ्या राज्यांमध्येही अनेक दलितांच्या हत्या झाल्या आहेत. पण तेव्हा गांधी यांनी एवढी संवेदनशीलता दाखविलेली नाही, अशी पलटवार भारतीय जनता पक्षाने केला.
लॅटरल एंट्री संबंधी मुद्दा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार केंद्र सरकारने लॅटरल एंट्रीच्या माध्यमातून सनदी अधिकाऱ्यांची भरती करण्याची प्रक्रिया मागे घेतली आहे. हे विरोधी पक्षांचे यश आहे असे मत काही विरोधी पक्षनेत्यांनी व्यक्त केले आहे. मात्र, लॅटरल एंट्री ही संकल्पना काँग्रेस प्रणित सरकारच्या काळातीलच आहे. तेव्हा राहुल गांधी यांनी तोंडी मिठाची गुळणी धरली होती. आता भारतीय जनता पक्षाच्या काळात ही योजना लागू होत असताना गांधी या योजनेला राजकीय स्वार्थासाठी विरोध करीत आहेत, अशी टीका भारतीय जनता पक्षाने केली.