पुणे / प्रतिनिधी :
सत्ताबदलाच्या काळात आज आपण गांधी, नेहरू, शास्त्री यांना विसरत चाललो आहोत. मात्र, आज गांधीविचाराची सर्वाधिक गरज असून, हा विचार विसरून चालणार नाही, असे मत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांनी रविवारी येथे व्यक्त केले.
महाराष्ट्र गांधी स्मारक निधीतर्फे आयोजित ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताहा’चे उद्घाटन सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. शिंदे म्हणाले, राष्ट्रभक्ती आणि जातीयता निर्मूलनाचे काम देशात महात्मा गांधींनी केले. त्यांच्या प्रेरणेने नेहरूंनी समाजवादी समाजरचना आणली. आज या टप्प्यावर वेगवेगळे प्रश्न गडद होत आहेत. गरीब व श्रीमंतांमधील दरी कमी होत नाही. लोकसंख्या वाढीने प्रश्न अजून जटील होत आहे. अशा वेळी गांधीविचार विसरून चालणार नाही. महात्मा गांधी यांनी आफ्रिकेतील कारकिर्दीपासून समाजसेवा सुरू केली. काँग्रेसमध्ये, देशात त्यांनी सेवाभाव, अस्पृश्यता निर्मूलन रुजविले. त्यांच्याच सर्वधर्मसमभावाच्या प्रेरणेने युवक क्रांती दल, डॉ. कुमार सप्तर्षी कार्यरत असून, त्यांचे काम चांगले सुरू असल्याचे शिंदे यांनी नमूद केले.
अधिक वाचा : मुख्यमंत्री शिंदेंच्या जीवाला धोका, सुरक्षा वाढवली
अध्यक्षस्थानावरून बोलताना अन्वर राजन म्हणाले, महात्मा गांधी हे संतपरंपरेच्या मालिकेतील व्यक्तिमत्त्व होते. अस्पृश्यता निर्मूलनाच्या त्यांच्या कार्यावर, जातीव्यवस्था नाकारण्यावर पुण्यातील धर्मवादी नाराज होते. ज्या शक्तींना मूळ धारेतून आपण बाजूला ठेवले, त्या फॅसिस्ट शक्ती बळकट होत आहेत. हे आव्हान समविचारी पक्ष, संस्था, संघटनांनी गांधी विचाराच्या साहाय्याने पेलले पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.