स्वच्छतेकडे बुडाचा कानाडोळा, नागरिकांतून संताप
प्रतिनिधी /बेळगाव
रामतीर्थनगर परिसरातील विविध विकासकामे राबविण्याचा निर्णय बुडाने घेतला आहे. मात्र सध्या या परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाले असून रस्त्याशेजारी आणि कणबर्गी येथील तलावात कचरा पसरला आहे. स्वच्छतेसाठी बुडाचे प्रयत्न अपुरे पडत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
रामतीर्थनगर वसाहत निर्माण करून 25 वर्षांहून अधिक कालावधी लोटला. तरीही येथील रहिवाशांना नागरी सुविधांसाठी आजही बुडा कार्यालयाच्या पायऱ्या झिजवाव्या लागत आहेत. वसाहतींचे हस्तांतर महापालिकेकडे करण्यात यावे, अशी मागणी अनेकवेळा केली होती. पण याबाबत कोणतीच कार्यवाही झाली नाही. परिसरातील रस्त्यांची दुरवस्था, मोडकळीस आलेल्या गटारी, उद्यानांची दुरवस्था झाल्यानंतर रामतीर्थनगर वसाहत महापालिकेकडे हस्तांतर करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला. त्यामुळे महापालिकेने वसाहत हस्तांतर करून घेण्याकडे नकार दिला. मात्र सध्या रामतीर्थनगर परिसरातील पथदीप दिवसा सुरू आणि रात्री बंद असा प्रकार सुरू आहे.
कचरा उचल करण्याकडे दुर्लक्ष
या परिसरातील कचऱ्याची उचल केली जात नसल्याने ऑटोनगर ते कणबर्गी रोडपर्यंतच्या मुख्य रस्त्याच्या दुतर्फा कचऱ्याचे ढिगारे साचले आहेत. येथील क्रिकेट स्टेडियमकडे जाणाऱ्या रस्त्याशेजारी कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. कचऱ्याची उचल करण्याकडे बुडा प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत कणबर्गी तलाव परिसराचा विकास करण्यात आला आहे. पण तलावात कचरा साचला असून याकडे दुर्लक्ष झाले आहे. रामतीर्थनगरसह कणबर्गी तलावाची स्वच्छता करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.